पावसाच्या उसंतीनंतर मध्यवर्ती यंत्रणा आणि विभाग कार्यालयांच्या समन्वयाने विक्रमी वेळेत खड्डे भरण्याची कार्यवाही केल्याचे सांगत मुंबई महापालिकेने पालिका क्षेत्रात रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या अनुषंगाने गत पाच वर्षांमधील सर्वोत्तम कामगिरी यंदा नोंदवली गेल्याचा दावा केला आहे.
पावसाळापूर्व कामे आणि नियोजन, तसेच पावसाळ्यात त्याची चोख अंमलबजावणी याचा परिणाम म्हणून पावसाळ्यात खड्डे तत्परतेने भरणे शक्य झाले आहे. पावसाने दिलेल्या उघडीपनंतर मुंबई महानगरात ५४ हजार खड्डे बुजवण्यात आले आहेत. पालिकेच्या संपूर्ण यंत्रणेने केलेले सूक्ष्म नियोजन, खड्डे बुजवण्यासाठी स्वतःहून घेतलेला पुढाकार आणि संयुक्त कामगिरीमुळे मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींचा विक्रमी वेळेत निपटारा करण्यात महानगरपालिका प्रशासनाला यश आले आहे. विशेष म्हणजे, यंदा नागरिकांकडून आलेल्या तक्रारींपेक्षा अधिक खड्डे यंत्रणेने स्वतः पुढाकार घेत भरले आहेत, असा दावाही पालिकेने केला आहे.
मुंबईतील तीन महामार्ग आणि मुख्य रस्त्यांवर खड्डे बुजवण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांच्या तक्रारीवर अवलंबून न राहता तुलनेत स्वतःहून सक्रीयपणे संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेने खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे नियोजनच यंदा करण्यात आले. प्रत्येक विभागात तसेच मुख्य रस्त्यांवरदेखील खड्डे बुजवण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि सूक्ष्म नियोजन याचाच प्रत्यय यंदा आला आहे. समवेत, मध्यवर्ती यंत्रणा आणि विभाग कार्यालयामार्फत झालेले समन्वय यामुळेच खड्ड्याच्या तक्रारी वेळेत मार्गी लावण्यातदेखील यश आले आहे, असे अतिरिक्त पालिका आयुक्त वेलरासू यांनी नमूद केले.
मुंबईत यंदा जुलै महिन्यात चार दिवस असे राहिले की एकाच दिवसात २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस कोसळला. सोबतच रस्त्यांवर वाहतुकीचा भार असतोच. सतत पाऊस सुरू राहिल्याने खड्डे होतात. मात्र, पावसाने विश्रांती घेताच संपूर्ण यंत्रणेने नियोजनाप्रमाणे अतिशय सूक्ष्म कामगिरी करत सगळीकडे खड्डे बुजवले. मुंबईतील रस्त्यांवर सततची व मोठ्या प्रमाणातील अवजड वाहनांची वर्दळ पाहता वाहतूक पोलिसांसह सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून ही कामगिरी अतिशय विक्रमी वेळेत पूर्ण करण्याची किमया पालिकेच्या रस्ते विभागाने केली आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबईतील पूर्व द्रूतगती महामार्ग (१८.६ किलोमीटर – मुलुंड ते शीव) आणि पश्चिम द्रूतगती महामार्ग (२७.६ किलोमीटर- दहिसर चेकनाका ते माहीम) अशा दोन्ही द्रूतगती महामार्गांचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नोव्हेंबर २०२२पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही महामार्गांची जबाबदारीदेखील महापालिकेकडे आहे. समवेत, पूर्व मुक्त महामार्गाची (१७ किलोमीटर) जबाबदारीदेखील पालिकेकडेच आहे. या तिन्ही महामार्गांच्या जबाबदारीचे आव्हान स्वीकारतानाच या रस्त्यांवर खड्डे राहणार नाहीत, याची पुरेपूर काळजी रस्ते विभागाने घेतली आहे, असेही वेलरासू यांनी नमूद केले.

