Homeमुंबई स्पेशलभायखळ्याच्या भोसले उद्यानात...

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील. उर्वरित दोन दिवस म्हणजेच शनिवार आणि रविवारी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ‘मुंबई पुष्पोत्सव’ नागरिकांसाठी खुला असेल.

यंदाचा हा २९वा पुष्पोत्सव आहे. मुंबईचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या देखरेखीखाली ‘मुंबई पुष्पोत्सव’ भरविण्यात येत आहे. शिशिर ऋतूची चाहूल लागली की मुंबईकरांना वेध लागतात ते ‘मुंबई पुष्पोत्सवाचे’. मुंबईकरांसाठी ही एक सुगंधी पर्वणी असते. विविध प्रजातींची रंगीबेरंगी फुलझाडे, फळझाडांची रोपे, औषधी वनस्पती तसेच विविध ऋतूंमध्ये आढळणारी फुले आदी मिळून सुमारे ५ हजार रोपांचा ‘मुंबई पुष्पोत्सवात’ समावेश असतो. पर्यावरणाची आवड आणि फुलझाडांवर प्रेम करणाऱ्या पर्यावरणप्रेमींसाठी पुष्पोत्सवात उद्यानविषयक साहित्याची विक्री, झाडांसाठी लागणारी खते आदींची दालनेही येथे खुली करण्यात येणार आहेत. या तीन दिवसांच्या ‘मुंबई पुष्पोत्सवात’ नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.

पर्यावरणप्रेमींसाठी उद्यानविषयक कार्यशाळा

मुंबई पुष्पोत्सवासोबतच ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत उद्यानविषयक कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यशाळेमध्ये बागकाम कसे करावे, झाडांची निगा कशी राखावी, रोपांना, झाडांना, वेलींना कोणते खत कधी व किती प्रमाणात द्यावे, याविषयी अभ्यासपूर्ण प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी, गृहिणी, व्यवसायिक तसेच हौशी लोकांसाठी विविध विषयांवर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येते.

मुंबई पुष्पोत्सवाला असणार आकर्षक संकल्पनेचे कोंदण

मुंबई पुष्पोत्सवात फुलझाडांची सुरेख मांडणी आणि आकर्षक सजावट केली जाते. यासोबतच दरवर्षी एक खास संकल्पना घेऊन पुष्पोत्सव साजरा केला जातो. गतवर्षी भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले होते. विविध फुलांच्या मनमोहक रचनांमधून राष्ट्रध्वज, भारतरत्न पुरस्काराची प्रतिकृती तसेच राष्ट्रीय फळ आंब्याची रचनाही झेंडूच्या फुलांनी साकारली होती. या सजावटीने मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले होते. यंदाच्या मुंबई पुष्पोत्सवातही आगळीवेगळी आणि आकर्षक संकल्पना राबविण्यात येणार आहे. सलग तीन दिवस सुरू राहणाऱ्या या पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात उत्तमोत्तम उद्याने, रस्ते दुभाजक, वाहतूक बेटे परिक्षित करणाऱ्या वृक्षारोपणामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रदर्शनाच्या निमित्ताने उद्यानविषयक स्पर्धेचेही आयोजन करण्यात येते. यात शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था, औद्योगिक संस्था, गृहनिर्माण संस्था इत्यादींनी परिरक्षित केलेली उद्याने, पोडियम उद्याने, रूफटॉप किंवा टेरेसवरील उद्याने, वर्टीकल उद्याने, रस्ते दुभाजक, वाहतूक बेटे व वृक्षारोपण यांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये एचपीसीएल, बीपीसीएल, एसबीआय, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, लोढा ग्रुप, रहेजा ग्रुप, अशोक टॉवर, कासा ग्रॅंडे, महिंद्रा टॉवर इत्यादी संस्थांनी सहभाग घेतला आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content