इर्शाळवाडी दुर्घटनेतील मुले, मुली, महिला, पुरुष, एकल स्त्रिया या सर्वांचे सर्व्हेक्षण करून अधिकाऱ्यांनी त्याची व्यवस्थित नोंद ठेवावी, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. कोणत्याही व्यक्तीसोबत गैरकृत्य होणार नाही याची दक्षता घ्यावी.. असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः तत्परतेने व संवेदनशीलतेने तत्काळ भेट दिली होती. याबाबत त्यांनी सविस्तर निवेदन विधानसभेमध्ये केले होते व प्रत्येक मृत व जखमी कुटुंबाला शासनाची सर्वोतोपरी मदतही जाहीर केली होती. विधानभवनात डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन सविस्तर माहितीही दिली होती. या भेटीवेळी त्यांनी अपादग्रस्त लोकांना तत्काळ मदत पोहोचत आहे का? तसेच सर्व मुले व महिलांना आवश्यक सुविधा दिल्या आहेत का? याबाबत याठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यासही सांगितले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

आज इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नढाल गावात जाऊन भेट घेत विचारपूस केली. तसंच त्यांच्या तात्पुरत्या राहण्याची सोय असलेल्या ठिकाणी जाऊन उपलब्ध सुविधांची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुलांशी बोलताना सांगितले की, सर्वांनी एकत्रित येऊन दहा-दहा लोकांचा समूह करून त्यातील एकाने सर्व अपादग्रस्त लोकांची जबाबदारी घ्यावी आणि काय वस्तू लागणार आहे त्याची यादी करावी व ती आम्हाला कळवावी. जेणेकरून, आपण एक कुटूंब असल्यासारखं एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो.

गावातील स्थानिक व्यक्ती ज्याला आपण सर्व ओळखता त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही त्यांनी मुलांना केली. त्यांनी मुलांना लगेच कामाला न जाता शिक्षण पूर्ण करण्याबाबत सांगितले आणि काहीही लागल्यास त्यांच्या फोनवर संपर्क साधण्याचे सांगितले. याकरिता डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचा स्वतःचा नंबर या अनाथ मुलांना दिला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनमार्फत सर्व मुलांचं पालकत्व स्वीकारण्यात येणार असून त्याद्वारे त्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील परिस्थितीचा प्रत्येक महिन्याला आढावा घेतला जाणार हे. समाजातून जी मदत इथे आली आहे त्या मदतीचे नीट वाटप होणे गरजेचे आहे. याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे अशी सूचनाही त्यांनी केली.
यावेळी आमदार महेंद्र थोरवे, आमदार मनिषा कायंदे, नगरसेविका शीतल म्हात्रे, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलमताई जोशी, मंगेश चिवटे, अप्पर जिल्हाधिकारी थोरवे, अप्पर तहसीलदार पूनम कदम, तहसीलदार अयुब तांबोळी, अदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम आदी उपस्थित होते.

