Homeन्यूज अँड व्ह्यूजजाणून घ्या श्री...

जाणून घ्या श्री गणेशचतुर्थीचे शास्त्र आणि महत्त्व!

उद्या श्री गणेशचतुर्थी! श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर 1 सहस्र पटीने कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो. श्री गणेशचतुर्थीस आचरण्यात येणाऱ्या व्रताविषयीचे शास्त्र आणि कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन करण्याचे महत्त्व सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखात समजून घेऊया.

कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन करण्याचे महत्त्व!- गणपति हा दहा दिशांचा स्वामी आहे. त्याच्या अनुमतीविना इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाहीत. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते; म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम गणपतीचे पूजन करतात. गणपति वाईट शक्तींना पाशाने बांधून ठेवत असल्याने त्याच्या पूजनामुळे शुभकार्यात येणारी विघ्ने दूर होतात. गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाशभाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोहोचतात.

डाव्या सोंडेचा गणपति अध्यात्माला पूरक असणे!- पूजेत शक्यतो डाव्या सोंडेचा गणपति ठेवावा. ‘उजव्या सोंडेचा गणपति हा अतिशय शक्‍तीशाली आणि जागृत आहे’, असे म्हटले जाते. पूजेत उजव्या सोंडेचा गणपति असल्यास कर्मकांडातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून दैनंदिन पूजाविधी पार पाडावे लागतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कर्मकांडातील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे शक्य होत नसल्याने पूजाविधीमध्ये चुका होतात आणि त्याचा आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. यासाठी पूजेत शक्यतो उजव्या सोंडेचा गणपति ठेवू नये. याउलट डाव्या सोंडेचा गणपति तारक स्वरूपाचा आणि अध्यात्माला पूरक असतो. याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.

गणेशचतुर्थी

श्री गणेशचतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत: श्री गणेशचतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे सिद्धीविनायक व्रत या नावाने ओळखले जाते. वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्त आहे. सर्व भाऊ एकत्र राहत असतील म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) आणि पाकनिष्पत्ती (चूल) एकत्र असेल, तर सर्वांत मिळून एक मूर्ती पुजली तरी चालते; पण ज्यावेळी द्रव्यकोश आणि पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील, तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशमूर्ती पुजावी. ज्या कुटुंबात एकच गणपति बसवण्याची दृढ परंपरा आहे, त्या कुटुंबात ज्या भावामध्ये देवाविषयी अधिक भाव आहे, त्याच्याच घरी गणपति बसवावा.

नवीन मूर्तीचे प्रयोजन: पूजेत गणपति असला, तरी गणपतीची नवीन मूर्ती आणावी. श्री गणेशचतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल. जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात आणि ती मूर्ती नंतर विसर्जित करतात.

श्री गणेशचतुर्थीला पुजावयाची मूर्ती कशी असावी?: चिकणमाती किंवा शाडूची माती यापासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी, तसेच पर्यावरणाला घातक आहे. मूर्तीची उंची अधिकाधिक एक फूट ते दीड फूट असावी. मूर्ती शास्त्रानुसार बनवलेली, पाटावर बसलेली, डाव्या सोंडेची अन् नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. परंपरा किंवा आवड याप्रमाणे गणेशमूर्ती आणण्यापेक्षा धर्मशास्त्रसंमत गणेशमूर्ती पुजावी.

गणेशचतुर्थी

शास्त्रोक्त विधी आणि रूढी यांचा अवधी: भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची सिद्धीविनायक या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य हा उत्सवप्रिय असल्याने एवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस श्री गणपति ठेवून त्याचा उत्सव करू लागला. बरेच जण (ज्येष्ठा) गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन करतात. एखाद्याच्या कुलाचारात गणपति पाच दिवस असेल आणि तो त्याला दीड किंवा सात दिवसांचा करावयाचा असला, तर तो तसे करू शकतो. यासाठी अधिकारी व्यक्तीस विचारण्याची जरूरी नाही. रूढीप्रमाणे पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, सहाव्या, सातव्या किंवा दहाव्या दिवशी श्री गणेशविसर्जन करावे.

मूर्तीची आसनावर स्थापना: पूजेपूर्वी ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करायची असते, त्यावर तांदूळ (धान्य) ठेवून त्यावर मूर्ती ठेवतात. आपापल्या प्रथेप्रमाणे थोडे तांदूळ किंवा तांदुळाचा लहानसा ढीग करतात. मूर्तीत गणपतीचे आवाहन करून तिची पूजा केल्याने मूर्तीत शक्ती निर्माण होते. त्या शक्तीमुळे तांदूळ भारित होतात. सारख्या कंपनसंख्येच्या दोन तंबोर्‍याच्या दोन तारा असल्या, तर एकीतून नाद काढल्यास तसा नाद दुसर्‍या तारेतूनही येतो. त्याचप्रमाणे मूर्तीखालील तांदुळात शक्तीमुळे स्पंदने निर्माण झाली की, घरातील तांदुळाच्या साठ्यातही शक्तीची स्पंदने निर्माण होतात. अशा तर्‍हेने शक्तीने भारित झालेले तांदूळ वर्षभर प्रसाद म्हणून खाता येतात.

मध्यपूजाविधी: गणपति घरी असेपर्यंत प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी प्राणप्रतिष्ठा सोडून गणपतीची नेहमी पूजा करतो तशी पूजा करावी आणि शेवटी आरत्या आणि मंत्रपुष्प म्हणावे. गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर प्रतिदिन करावयाची पंचोपचार पूजा करावी.

उत्तरपूजा: गणपतीच्या विसर्जनापूर्वी ही पूजा करायची असते. विशिष्ट मंत्र म्हणून पुढे दिल्याप्रमाणे पूजा करावी- 1. आचमन, 2. संकल्प, 3. चंदनार्पण, 4. अक्षतार्पण, 5. पुष्पार्पण, 6. हरिद्रा (हळद)-कुंकूमार्पण, 7. दूर्वार्पण, 8. धूप-दीप दर्शन आणि 9. नैवेद्य. यानंतर आरती करून मंत्रपुष्पांजली समर्पावी. सर्वांनी गणपतीच्या हातावर अक्षता द्याव्या आणि मूर्ती उजव्या हाताने हालवावी.

गणेशचतुर्थी

विसर्जन: उत्तरपूजेनंतर मूर्तीचे जलाशयात विसर्जन करतात. विसर्जनाला जाताना गणपतीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी आणि मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी.

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करणे वर्ज्य असणे- श्री गणेशचतुर्थीला ‘कलंकित चतुर्थी’ असेही म्हणतात. या चतुर्थीला चंद्र पाहणे वर्जित आहे. चुकूनही चतुर्थीचा चंद्र दिसल्यास ‘श्रीमद्भागवता’च्या 10व्या स्कंधाच्या 56-57व्या अध्यायात दिलेली ‘स्यमंतक मण्याची चोरी’ ही कथा आदराने वाचली किंवा ऐकली पाहिजे. भाद्रपद शुक्ल तृतीयेचा किंवा पंचमीचा चंद्र पाहावा. यामुळे चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यास त्याचा अधिक धोका राहत नाही. चुकून चंद्रदर्शन झाल्यास पुढील मंत्राने अभिमंत्रित केलेले पवित्र जल प्राशन करावे. या मंत्राचा 21, 54 किंवा 108 वेळा जप करावा.

सिंहः प्रसेनमवधीत् सिंहो जाम्बवता हतः।
सुकुमारक मा रोदीस्तव ह्येष स्यमन्तकः।। – ब्रह्मवैवर्त पुराण, अध्याय 78

अर्थ: हे सुंदर सुकुमार! या मण्यासाठी सिंहाने प्रसेनला मारले आहे आणि जांबुवंताने त्या सिंहाचा संहार केला आहे; म्हणून तू रडू नकोस. आता या स्यमंतक मण्यावर तुझाच अधिकार आहे.

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘गणपति’

आज हरितालिका

भाद्रपद शुद्ध तृतीयेला म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणार्‍या हरितालिका या सणाच्या दिवशी स्त्रिया आणि कुमारिका व्रतस्थ राहतात. हे व्रत करण्यामागील शास्त्र आणि या व्रताचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.

  1. इतिहास आणि उद्देश- पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले; म्हणून मनासारखा वर मिळण्यासाठी, तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात.
  2. व्रत करण्याची पद्धत- प्रातःकाळी मंगलस्नान करून पार्वती आणि तिची सखी यांच्या मूर्ती आणून त्या शिवलिंगासह पूजल्या जातात. रात्री जागरण करतात. दुसर्‍या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून लिंग आणि मूर्ती विसर्जित करतात. हरितालिकेच्या पूजनाच्या वेळी 16 शक्तीस्वरूप नाममंत्रांचे पठण करत 16 पत्री शिवपिंडीवर वाहतात. त्यामुळे शिवपिंडीत शिवस्वरूप शक्तीचा प्रवाह आकृष्ट होतो. पत्रीपूजनातून अधिक प्रमाणात शक्तीची स्पंदने निर्माण होतात.

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

संपर्क क्रमांक: 9920015949  

Continue reading

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना अजून शासकीय ई-मेलच नाही?

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अनेक आघाड्यांवर जोरदार कार्यरत असले तरी राज्य सरकारने त्यांना तसेच या विभागाच्या प्रधान सचिवांना शासकीय ई-मेलच दिला नाही की काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी हिंदू मंदिर संवर्धन अभियान, मुंबई सांस्कृतिक...

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....
Skip to content