Homeबॅक पेजराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहा सरसंघचालक!

स्वामी विवेकानंद यांनी प्रतिपादन केले होते की, “वेदांत आणि विज्ञान झोपडीझोपडीपर्यंत पोहोचविल्याशिवाय या देशातील दरिद्रीनारायणाचा नवकोट नारायण होणार नाही.” त्यांचे हे स्वप्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने साकार केले.

२७ सप्टेंबर १९२५ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि आधुनिक भारताच्या इतिहासात एक नवे सोनेरी पान लिहिले गेले. डॉ. हेडगेवार हे केवळ वैद्यकीय व्यवसायातील तज्ज्ञ होते असे नाही तर त्यांना प्रथमश्रेणीचे समाजशास्त्रज्ञ असेही म्हटले पाहिजे. हिंदू समाजातील गुणदोषांचे वस्तुनिष्ठ आकलन करून या विराट समाजपुरुषातील चैतन्य जागृत करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हे अखिल भारतीय संघटन अत्यंत कुशलतेने व दूरदृष्टीने स्थापन केले. गेल्या १०० वर्षांतील संघाच्या वाटचालीचे वर्णन म्हणजे ‘राष्ट्रजीवनातील चैतन्यपर्व’ असे करावे लागेल.

डॉक्टरांच्या दिव्यदृष्टीचे आदर्श समोर ठेवून माधव सदाशिव गोळवलकर गुरुजींनी संघाला १९४० ते १९७३ तीन दशकांचे खंबीर नेतृत्त्व दिले. त्यांनी  आध्यात्मिक ब सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया घातला. त्यानंतर बाळासाहेब देवरस यांनी सामाजिक समरसतेचा सिद्धांत मांडला व तो कृतीमध्ये आणला. डॉ. राजेंद्रसिंह तोमर उर्फ रज्जूभैय्या यांनी संघ गंगा-यमुनेपासून हिमालयापर्यंत नेऊन ठेवला. त्यांनी ‘जगातील हिंदूंनो एक व्हा’ अशी हाक दिली. के. सुदर्शन यांनी त्या काळात डावीकडे वळणाऱ्या भारतीय तरुणांना हिंदुत्वाचे तेजस्वी रूप दर्शविले. डॉ. मोहन भागवत यांनी भविष्यकालीन भारताचे आदर्श चित्र रेखाटले आणि ते नरेंद्र मोदी युगात (२०१४ ते आजपर्यंत) प्रत्यक्षात कृतीत आले. भारतीय राष्ट्रजीवनाच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीचा हा संघ साक्षीदार आहे. निरपेक्ष सेवाकार्य हे राष्ट्राच्या बांधणीतील अत्यंत महत्त्वाचे सूत्र असून राष्ट्रीय चारित्र्याची जडणघडण हे संघाचे अंतिम उद्दिष्ट आहे. यादृष्टीने संघाच्या गेल्या १०० वर्षांतील वाटचालीचा शास्त्रीय आलेख ‘सहा सरसंघचालक’ या ग्रंथात मांडला आहे. शाश्वत विकासातील संघाची भूमिका हे भारताच्या भविष्यकालीन उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे “मी सागरात उडी टाकली हे लोक विसरले तरी चालेल पण मी सामाजिक सुधारणा सांगितल्या हे लोकांनी विसरता कामा नये.” समाजसुधारणा आणि विज्ञाननिष्ठ नवभारताची उभारणी या संदर्भात रा.स्व. संघ सावरकरांचे स्वप्न साकार करीत आहे.

ग्रंथाचे लेखक प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर आपल्या मनोगतात म्हणतात की, या ग्रंथात एकूण ११ प्रकरणे आहेत. त्यांपैकी ‘उष:काल’, ‘रा.स्व.संघ हिंदुत्वाचे चैतन्यपर्व’ या प्रकरणाचे स्वरूप प्रास्ताविक असे आहे. त्यानंतर क्रमाने डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजी, बाळासाहेब देवरस, राजेंद्रसिंह, के. सुदर्शन, मोहन भागवत यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे सहा लेख आहेत. त्यानंतर ‘शतकोत्तर आव्हाने’, ‘संघ आणि शाश्वत विकास’ आणि ‘उपसंहार’ अशा तीन प्रकरणांचा समावेश आहे. शेवटचे प्रकरण वगळता, प्रत्येक प्रकरणात टीपा व संदर्भ दिले आहेत. मूळ लेख वृत्तपत्रांतील होते. त्यामुळे त्यामध्ये टीपा नव्हत्या. काही टीपा कंसात दिल्या होत्या. त्या सर्वांची नोंद तळटीपा म्हणून प्रत्येक पानावरच केली आहे.

सहा सरसंघचालक

लेखक: प्रा. डॉ. विजय धारूरकर

प्रकाशक: वरदा प्रकाशन

पृष्ठे: १८२

मूल्य: २५० रुपये

टपालखर्च: ५० रुपये

पुस्तक खरेदीसाठी संपर्कः ग्रंथ संवाद वितरण (8383888148)

Continue reading

खिचडीचा आणखी एक प्रकार.. ‘सिनेमा खिचडी’!

'सिनेमा खिचडी', या पुस्तकाचे लेखक नामवंत सिनेपत्रकार आहेत. आतापर्यंत त्यांची सेहेचाळीस पुस्तके बाजारात आली असून हे सत्तेचाळीसावे पुस्तक आहे. नुकताच त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा 'शिरीष कणेकर पुरस्कार' घोषित झाला आहे. आपल्या पुस्तकात प्रस्तावना लिहिताना लेखक दिलीप ठाकूर लिहितात- खिचडीची...

कौटुंबिक अंदाजपत्रकाचा आराखडा आखण्यापूर्वी हवे ‘फॅमिली बजेट’!

जन्मापासून प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कितीतरी खर्चांना तोंड द्यावे लागते. शिक्षण, नोकरी, स्वतःचे घर, विवाह, मुले, त्यांचे शिक्षण... एक ना अनेक! विविध स्वरूपात खर्चाचे रहाटगाडगे आपले सुरूच असते! आपली मिळकत आणि खर्चाचा मेळ घालण्यासाठी काटेकोर नियोजनाची गरज असते. म्हणूनच प्रत्येक...

आर्थिकदृष्ट्या तरबेज करणारे ‘महिलांचे अर्थभान’!

अनेक घरांमध्ये गृहलक्ष्मीला कौतुकाने 'गृहमंत्री' असे म्हटले जाते. संपूर्ण घराचे व्यवस्थापन निगुतीने करण्याचे कौशल्य स्त्रीमध्ये असते, याचीच ही पावती असते. पण या गृहमंत्र्याच्या हातात कुटुंबाच्या अर्थकारणाच्या नाड्या असतात का, या प्रश्नाचे उत्तर मात्र बऱ्याचदा 'नाही' असे असते. नोकरी व्यवसाय...
Skip to content