उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याचदिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत, असा पलटवार भारतीय जनता पार्टीने एक्सवर केला आहे.
राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नहीं बताऐंगे, अशी टीका तुम्हीच केली होती. पण आता २२ जानेवारी रोजी मंदिराचं लोकार्पण होतंय. त्यामुळे तुमच्या पोटात गोळा उठला आहे.
कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात भाजप जिंकली की इव्हीएमवर शंका. उद्धव ठाकरे किती रडारड करणार?, असा सवालही भाजपाने केला आहे.

आपल्या बगलबच्चांना याचिका मागे घेण्यास सांगा…
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंना चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक झालीच पाहिजे, लवकर झाली पाहिजे… या आपल्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. म्हणूनच तुम्ही वॉर्ड रचनेबाबत आपले बगलबच्चे राजू पेडणेकर आणि समीर देसाई यांनी केलेल्या याचिका मागे घ्या… तुम्ही जे घालवलेत त्या ओबीसीच्या आरक्षणाची याचिकाही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे… त्याचा निकाल न लागता, ओबीसींना आरक्षण न देता तुम्हाला निवडणुका हव्यात का? आमच्या ओबीसींच्या पाठीत असा खंजीर खुपसणार का? असा छुपा अजेंडा घेऊन का येताय?
“मर्दा”सारखे मैदानात या… भाजपाचे कार्यकर्ते तुम्हाला हरवण्यासाठी पूर्ण ताकदीने सज्ज आहेत. मी तर तुमच्या पराभवाचे ढोल, तुतारी आणि सोनेरी पेढ्यांची ऑर्डर देऊनच ठेवलेय. तुमचे बोलघेवडे आणि आमचे ध्येयवेडे अशी लढत होऊनच जाऊ द्या… लक्षात ठेवा. विजय नेहमी ध्येयवेड्यांचाच होतो! छत्रपतींचा आशीर्वाद.. मुंबईकरांची भाजपालाच साथ!, असे शेलार यांनी एक्सवर म्हटले आहे.
.. म्हणून तुमचा हा कलकलाट!
भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही एक्सद्वारे ठाकरेंवर पलटवार केला आहे. होय उद्धवजी…! मोदींची लाट आहे; म्हणून तुमचा हा कलकलाट आहे..!! हरले की ईव्हीएम मशिनवर खापर फोडायचं आणि जिंकले की स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची, हा रडीचा खेळ बंद करा.. एक ध्यानात ठेवा, तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्वाशी गद्दारी केलीत.. त्यामुळे निवडणूक ईव्हीएमवर होवो किंवा बॅलट पेपरवर, तुमच्या नावापुढे मतदारांनी केव्हाच फुली मारलीय.., असे वाघ म्हणाल्या.