ज्या दाऊदने मुंबईत खून पाडले त्या मुंबईच्या खुन्यांबरोबर व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान देणाऱ्या दाऊदला समर्पित असणारे, दारूवर सवलतींचा वर्षाव करून बेवड्यांना समर्पित असणाऱ्या या सरकारबरोबर चहापान करण्यात आम्हाला स्वारस्य नाही, असे सांगत विरोधी पक्षांनी आज सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ठेवलेल्या चहापानावर बहिष्कार घातला.
राज्य विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांची एक बैठक आज मुंबईत झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खुन्यांशी व्यवहार करणाऱ्यांसोबत राहतात, हेही आम्ही पाहत आहोत. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर आम्ही त्यांच्या राजीनाम्यासाठी विधिमंडळात आक्रमक होणारच. पण आम्हाला चर्चेत रस आहे. अधिवेशनात अनेक मुद्दे आम्ही मांडणार व त्यावर चर्चासुद्धा करणार, असे ते म्हणाले.
आज राज्यातला शेतकरी हवालदिल आहे. त्यात त्याची वीज कापली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वेळा वीज न कापण्याबाबत शब्द दिला. पण त्यांचे कुणी ऐकत नाही. शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही. ऊस गाळपासाठी जाणार नाही, अशी स्थिती आहे. कर्जमाफीतील रक्कम आजही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजारांचे अनुदान अजूनही दिलेले नाही. हे सर्व विषय आम्ही अधिवेनात मांडणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
विविध समाजांचे प्रश्न आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी छत्रपतींना उपोषणाला बसायला बाध्य व्हावे लागले. त्यानंतरही सरकारने पुन्हा तीच आश्वासने दिली आहेत. ओबीसींसाठी असलेल्या महाज्योती संस्थेकडे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायला पैसे नाहीत. आदिवासींना पेचाचे पैसे मिळत नाहीत. अशा अनेक बाबींवर आम्ही अधिवेशनात सरकारला जाब विचारणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.
आज भ्रष्टाचार चरमसीमेला पोहोचला आहे. लिपिक साहेबांकडे लाच मागतो अन् कंत्राटदारांकडून बचावासाठी काही अधिकारी बंदुकांची मागणी करतात, अशी भयावह स्थिती राज्यात आहे. शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदारांना वाऱ्यावर सोडत या सरकारने लॉकडाऊननंतर दारूवर विविध करसवलतींचा वर्षाव केला. बेवड्यांना समर्पित असलेले हे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
आमच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमावर नुसती पोस्ट टाकली तर २५-२५ पोलीस घरी पाठवले जातात. नारायण राणे, नितेश राणे, प्रविण दरेकर या आमच्या नेत्यांना विविध माध्यमातून त्रास दिला जात आहे. पण केंद्र सरकार आपल्याला त्रास देत असल्याचा कांगावा येथील सत्ताधारी करत आहेत. महाराष्ट्र या अहंकारी सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. आमच्या काळात महाआयटीमध्ये घोटाळा झाला असल्यास त्याची चौकशी करा. कोणी रोखले आहे? एसटीच्या ८० कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्त्या केल्या आहेत. एसटीच्या विलिनीकरणावरून संबंधित समितीने दिलेला अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

