मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची खलबते आणि कट-कारस्थाने सुरू झाली असून पराभवाच्या भीतीने पळवाटा शोधण्याचे काम शिवसेना करते आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी आज केला.
भाजपा प्रदेश कार्यालयात आज पत्रकार परिषद घेऊन शेलार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना करीत असलेल्या कटकारस्थानांचा पर्दाफाश केला. यावेळी महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, विश्वास पाठक आदी उपस्थित होते.
मुंबई महापालिका निवडणुकीबाबत ज्या घडामोडी सुरू आहेत त्याबाबत आमचे बारीक लक्ष आहे. दीड वर्षापूर्वी कोरोनाची पहीली लाट आटोक्यात येते असे होताच त्यांचा पहिला डाव मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा विचार झाला होता. पण दुर्दैवाने कोरोनाची दुसरी लाट आली आणि यांचा डाव फसला. दुसरा प्रयत्न असा केला की २०१७मध्ये प्रभागरचना आहे ती असंवैधानिक आहे अशी चर्चा सुरू केली. भाजपाने आपल्या फायद्याची प्रभागरचना केली असे आभासी वातावरण निर्माण केले गेले. पण ती वॉर्डरचना 2021च्या जनगणनेच्या आधारावरच असल्याचे दिसून आले व हा प्रयत्न अभ्यास नसल्यामुळे फसला. त्यासाठी मुंबई महापालिकेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना मोठ्या पगारावर घेण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला.
पुन्हा तिसरा प्रयत्न आता सुरू आहे. कोरोनाची तिसरी लाट येत आहे, काळजी घेतली पाहिजे ही आमचीसुद्धा भूमिका आहे. तिसऱ्या लाटेमुळे अनेक अडचणी येतील असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. पण त्याचा फायदा घेत जनगणना करता येत नाही. नवी मतदारनोंदणी करताना अधिक वेळ लागेल. त्यामुळे महापालिकेला दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा प्रयत्न आता शिवसेनेचा सुरू आहे, असा आरोप शेलार यांनी केला. ही भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीला मान्य आहे का, असा सवालही त्यांनी केला.

मुंबईत 30 वॉर्ड असे आहेत जे शिवसेना आणि काँग्रेसला आजन्म जिंकता येणार नाहीत. त्यामुळे या वॉर्डांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. कायदा आणि कोरोनाचा विचार करुन निवडणुका घ्या. भाजपा तयार आहे, असे त्यांनी सांगितले.
जर निवडणूक आयोगाला पुढे करुन दोन वर्षे निवडणुका पुढे ढकलत असाल तर त्या दोन वर्षांतील सर्व कंत्राटे, ठेके यांच्या मंजुरीचे विषय स्थायी समितीकडे न जाता निवडणूक आयोगाकडे पाठवा. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प 20 हजार कोटींचा असून अशा अनेक प्रकल्पांना मंजुरी देणे बाकी आहे. त्यांच्या “कट”साठी ही कारस्थाने सुरू आहेत असा आरोपही त्यांनी केला.
गाळ कुठे टाकला? फोटो दाखवा
त्यांनी नालेसफाईच्या मुद्द्यावरूनही शिवसेनेवर टीका केली. 70 कोटी खर्च करुन केलेली नालेसफाई संपूर्ण आभासी आहे. विषय दाव्याचा नाही, वाद्याचा आहे. मुंबईकरांना शब्द दिला होता, मुंबई तुंबू देणार नाही. आता बचाव करू नका, पळून जाऊ नका. 5 लाख मेट्रिक टन गाळ काढला म्हणता, मिठी नदीचा जरी गाळ पकडला तरी तो टाकला कुठे?, असा सवालही त्यांनी केला.
ते सरकारी डम्पिंग ग्राऊंड असेल तर गाळ टाकल्याचा फोटो दाखवा, खासगी असेल तर सीसीटीव्ही दाखवा, गाळ कुठे मोजला त्या वजनकाट्याच्या पावत्या दाखवा, असे आव्हान देतानाच नालेसफाईतसुद्धा कट कमिशन सुरू असल्याचा दावाही शेलार यांनी केला.

