मुंबईच्या महर्षी कर्वे रोडवरील आयकर विभागाचे दिमाखदार कार्यालय माहीत नसेल असा माणूस विरळाच! हल्ली मुंबईची रया बिघडत चालली असली तरी एकेकाळी संपूर्ण महर्षी कर्वे रोडच दिमाखदार दिसत असे. आता तुम्ही विचाराल आज हे आयकर विभागाचे मध्येच काय काढलेत? काय नोटीसबीटीस आली आहे की काय?? कोणीतरी म्हटलेच आहे की “the income tax created more criminals than any other single act of government” असं जरी असलं तरी गुन्हेगारांचा-पोलिसांचा माझा संबंध फक्त वार्तांकनापुरताच असतो. बाकी मी वरच्या जगातीलच आहे.
असो.. तर अशा या आयकर कार्यालयाच्या बाजूची गल्ली जी बालवास हॉटेलपर्यंत जाते (तेच बालवास जे तुमच्या मनात आहे..). त्या गल्लीच्या दोन्ही बाजूस केंद्र सरकारची कार्यालये आहेत. ही गल्ली बऱ्यापैकी मोठी, रूंद असल्याने मुंबई महापालिकेच्या नियमानुसार फूटपाथ असणे बंधनकारक आहे. माझ्या आठवणीनुसार आयकर इमारतीच्या लगत या गल्लीत अगदी छोटीशी फूटपाथ होती व आतील बाजूस थोडीशी हिरवळ होती. दोन दिवसांपूर्वी या परिसरात मी निवांत फेरफटका मारला तेव्हा तेथील छोटीशी का होईना फूटपाथ चक्क चोरीला गेल्याचे दिसून आले. तेथे आता आयकर अधिकाऱ्यांच्या चकाचक गाड्यांसाठी चक्क विश्रांतीस्थळ निर्माण करण्यात आल्याचे दिसून आले.
बरोबरच आहे, म्हणा! आजकाल आयकर खात्याचा पसारा दिवसेंदिवस वाढत असताना आणि त्याबरोबरच अधिकाऱ्यांची संख्याही वाढत असताना साहजिकच गाड्यांची संख्याही वाढणार हे ओघाने आलेच. पूर्वी आयकर कार्यालयात जेमतेम 10/15 अधिकारी असायचे. हल्ली अधिकारी मोजायला हातापायाची बोटही कमी पडतात!! उच्च मध्यमवर्गीय, उद्योजक, व्यावसायिक आणि प्रभावशाली नोकरशहा तसेच राजकीय नेते यांच्या प्रत्येक रुपयाचा हिशेब दुर्बिणीखाली घालून तपासला जातो आणि नंतरच मरी आईसारखा आयकर फेरा सुरू होतो.

खरेतर या फेऱ्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यास हरकत नाही. कारण, अनेकवेळा आपण कशावर पैसे खर्च केले हे आपल्याच लक्षात राहत नाही. परंतु जनतेच्या पैशाची दुर्बिणीखाली तपासणी करणाऱ्या आयकर खात्याने मुंबई महापालिका नियमही दुर्बिणीखाली घालून पाहणे गरजेचे होते. की, ते काम नेमके या अधिकाऱ्यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याकडे दिले आहे? केंद्रीय बांधकाम खात्याला वाटते की, आपण या देशात कसेही बांधकाम करू शकतो. कोण मला पुसतो ते मी पाहे, अशी त्यांची कामकाजाची वृत्ती मी पवईच्या आयआयटीत पाहिलेली आहे. पण नियमावर बोट ठेवून चालणाऱ्या आयकर विभागाने हे कसे चालवून घेतले?
आयकर खात्याची कार्यालये अनेक ठिकाणी असताना सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकत्र बसायची इतकी हौस का? की दक्षिण मुंबईचा मोह त्यांनाही सोडवत नाही?? महर्षी कर्वे रोड व आतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कार्यालये आहेत. हजारो माणसांची ये-जा असते. तसेच त्या परिसरात मुंबई (बॉम्बे) हॉस्पिटलही आहे. रक्तचाचण्या करणारे नामांकित केंद्र आहे. या सर्व मंडळींना या रस्त्याशिवाय अन्य पर्याय नाहीत. आहेत ते अंमल दूर आहेत. हे लक्षात घेता आयकर विभागाने अधिकाऱ्यांच्या गाड्यांचे विश्रांतीस्थळ बदलावे असे सुचवावेसे वाटते. केंदीय बांधकाम विभाग, केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने मनावर घेतले तर अधिकाऱ्यांच्या गाड्यांसाठी मोठा पार्किंग प्लाझा उभारला जाऊ शकतो. पण, मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार तरी कोण? कारण, प्रत्येकाच्या मायाला माती आहे. पंगा घेणार तरी कोण?

