मी केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मागितले तर मला राज्यमंत्रीपदही सोडावे लागेल, असे रामदास आठवले यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला. या वाक्याचे स्पष्टीकरणही लगेचच त्यांनी केले. केंद्रातल्या मोदी सरकारमध्ये असलेल्या लहान पक्षांच्या प्रत्येक कॅबिनेट मंत्र्यांच्या पक्षाचे दोन-चार खासदार निवडून आले आहेत. आमच्या पक्षाचा एकही खासदार नाही, महाराष्ट्रात एकही आमदार नाही. मग कॅबिनेट मंत्रीपद मागू तरी कसे, असे ते म्हणाले.
आमच्या पक्षाचे म्हणजेच रिपब्लिकन पक्षाचे आसाम, मिझोराम, अशा ईशान्य राज्यांमध्येही प्रतिनिधी आहेत. मात्र, ज्या महाराष्ट्रातून मी येतो, राज्यसभेवर निवडून जातो, त्या महाराष्ट्रात आमच्या पक्षाचा मुंबईत एकही प्रतिनिधी असू नये, ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. मित्रपक्षही आम्हाला जागा सोडत नाहीत. त्यांच्या चिन्हावरही उमेदवार देऊ देत नाहीत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागा सोडण्यासाठी तयार होते. त्यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडे विषय सोपविला. त्यांनी पुढे प्रतिसादच दिला

नाही. आज आमच्या पक्षाचे उमेदवार इतर राज्यांमध्ये निवडून येतात. आता प. बंगाल, तामिळनाडू, केरळ येथेही आम्ही निवडणूक लढवित आहोत. आणखी फक्त दोन राज्यांमध्ये आमचे लोकप्रतिनिधी निवडून आले की आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल. पण, याकरीता मेहनत घ्यावी लागेल. येत्या पाच वर्षांत आपण यादृष्टीने पक्षसंघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत, असेही आठवले यांनी सांगितले.
तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून गेल्याबद्दल त्यांनी मुंबईत माध्यम प्रतिनिधींबरोबर नुकत्याच अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी बोलताना आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचली असल्याचे सांगितले. मोदी यांची लोकप्रियता २०१४ साली जशी होती तशीच आताही आहे. त्यांची लोकप्रियता वाढतच आहे. प. बंगालमध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे जवळजवळ ७० उमेदवार ३-४ हजार मतांनी पराभूत झाले होते. यावेळी तसे होणार नाही. या निवडणुकीत आम्हीही आमचे काही उमेदवार उभे केले आहेत आणि उर्वरित ठिकाणी भाजपला पूर्णपणे समर्थन दिले आहे, असे आठवले म्हणाले.

