ज्या पक्षाने सर्व काही दिलं त्या पक्षाशी गद्दारी करून माझ्याविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणणाऱ्या गद्दारांसमोर मला जायचे नव्हते म्हणून नेतिकतेच्या कारणावरून आपण आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असे उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांना सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे समाधान झाले. देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही, असा प्रश्न होता. सत्तेसाठी हपापलेले लोक जे उघडेनागडे राजकारण करत होती त्याची चिरफाड सर्वोच्च न्यायालयाने केली. राज्यपालांची भूमिकाही अयोग्य होती. त्याचे वस्त्रहरण या निकालात करण्यात आले. राज्यपाल नावाची जी यंत्रणा आहे ती आतापर्यंत एक आदरयुक्त यंत्रणा होती. मात्र शासनकर्ते या यंत्रणेचे जे धिंदवडे काढतात ते लक्षात घेता ही यंत्रणा यापुढे अस्तित्त्वात ठेवावी की नाही हा विषय घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे न्यायालयाने सोपवला आहे. मात्र त्यावेळचा पक्ष म्हणजे माझी शिवसेना यांच्या पक्षादेशाचा विचार त्यांना करावाच लागेल. त्यामुळे यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा आमचा आग्रह राहील. आता लढायला सुरुवात झाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यासाठी इथे आले आहेत. आम्हाला देशाला वाचवायचे आहे. संविधानाला वाचवायचे आहे. देशाला पुन्हा गुलाम बनवणाऱ्या प्रवृत्तींना घरी पाठवायचे आहे. याकरीता सर्व पक्ष, सर्व लोकांना एकत्र करण्याचे काम आम्ही सुरू केलेले आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
नितीश कुमार यांनी याला दुजोरा देताना जास्तीतजास्त राजकीय पक्षांनी एकत्र यावे आणि त्यांची एकजूट कायम राहावी यासाठी प्रयत्न करण्याचे एक पाऊल म्हणूनच आम्ही येथे आलो आहोत, असे यावेळी सांगितले.

