सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहता राज्यपाल ही यंत्रणा पुढे चालू ठेवावी की नाही, याबद्दल सर्वोच्च न्यायालयात जाण्याची वेळ आता आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यपाल यांची नेमणूक कोण करते? हा राष्ट्रपतींचा विषय आहे. त्याचा न्यायालयाशी काय संबंध? घटना माहित आहे की नाही? इतके बेसिक ज्ञानही नाही…, अशा आशयाची विधाने करत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काल उद्धव ठाकरे यांची एका पत्रकार परिषदेत खिल्ली उडवली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पदावर राहणार हे निश्चित झाले आहे. मात्र या निर्णयामुळे काही जणांना पोटशूळ उठला आहे. काल संध्याकाळपासूनच विरोधकांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या, 16 आमदार आज अपात्र होणार, हे सरकार जाणार… उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार… पण कसे होणार? 145चा बहुमताचा आकडा त्यांच्याकडे आहे का? काहीही बोलायचे आणि संभ्रम निर्माण करायचा, हे काम विरोधक करत होते, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी आज एक पत्रकार परिषद घेत नैतिकतेच्या कारणावरून आपण आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असे सांगितले. नैतिकता आणि उद्धव ठाकरे यांचा कधी संबंध आलाय का? भारतीय जनता पार्टीबरोबर एकत्र येऊन निवडणूक लढवली. बहुमत मिळाले. पण ठाकरे भाजपाबरोबर आले नाहीत. मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व नीतिमत्ता, नैतिकता सगळं काही सोडून पवारांच्या बाजूने गेले. त्यामुळे प्रामाणिकपणा, नैतिकता, नीतिमत्ता हे शब्द त्यांनी वापरू नयेत. त्यांना ते शोभत नाहीत. चाळीस आमदार त्यांच्या डोळ्यासमोर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले. त्यांना थांबवण्याची यांच्यात हिंमत नाही आणि आता म्हणतात की सर्वोच्च न्यायालय एकनाथ शिंदे यांना खाली उतरवणार… उद्धव ठाकरे यांना परत मुख्यमंत्रीपदी बसवणार. काय गणपती आहे का? एकाला काढला, दुसऱ्याला बसवला? संविधानाचे किती अज्ञान आहे या माणसाला…, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला.
या निकालामुळे संजय राऊत मंडळीचा पार पालापाचोळा झाला आहे. काय येतो… काय चालतो.. काय बोलतो? मेरा नाम जोकरपेक्षा भयानक प्रकार आहे. आपल्या बोलण्यामुळे शिवसेना संपली याचे भानही त्यांना नाही. अनिल परब, संजय राऊत हे या शिवसेनेचे लीडर. मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, मधुकर सरपोतदार असे नेते गेले आणि आता हे लीडर झाले, असेही ते म्हणाले.
आपल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणतात की, लोकशाहीची हत्त्या होते की काय असे मला वाटत होते. आता तुमची शिवसेना ही फक्त गल्लीपुरता राहिली आहे. राज्य आणि देशाचा विचार करण्याची तुम्हाला गरज नाही. नितेश कुमार यांच्याबरोबर बसले काय आणि त्यांना देशव्यापी झाल्यासारखे वाटले. पण तुमची जागा मातोश्री एके मातोश्री… बाहेर नाही. क्षेत्र किती? तर मातोश्री… त्यामुळे उगाचच काही बोलण्यात अर्थ नाही. पूर्ण देशामध्ये भाजपाचे 303 खासदार आहेत. आता भाजपाशिवाय तुम्ही निवडणूक लढवाल तेव्हा एक तरी निवडून आणा आणि दाखवा. मग कळेल की आपली ताकद किती आहे. उद्धव ठाकरे यांनी आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर भाष्य करू नये. त्यांची पात्रता नाही. आपल्याकडे दहा-बारा आमदार आहेत. 2024पर्यंत ते तरी राहतील का याचा विचार करावा आणि मग बोलावे, असेही नारायण राणे म्हणाले. संजय राऊत यांचे एक घर आता कमी झाले आहे. शरद पवारांनी त्यांना ज्या पद्धतीने झोडला ते त्यांनी ओळखले पाहिजे आणि पक्षाचे मातोश्रीतून निमुटपणे काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

