कोरोनाला अटकाव करताना राज्यातल्या तरूणांच्या लसीकरणाची जबाबदारी पेलण्यात विविध राज्य सरकारांना आलेल्या अपयशानंतर आता केंद्र सरकारने या वर्गाचेही मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ही घोषणा केली. येत्या आंतरराष्ट्रीय योग दिनापासून म्हणजेच २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांना केंद्र सरकारतर्फे मोफत लस दिली जाईल, असे त्यांनी देशाला संबोधित करताना जाहीर केले.
आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशाला संबोधित केले. १६ जानेवारीपासून केंद्र सरकारने भारतात लसीकरणाला सुरूवात केली. आरोग्य कर्मचारी, त्यानंतर ६० वर्षांवरील नागरिक, त्यापाठोपाठ सहव्याधी असलेले ४५ वर्षांवरील नागरिक अशा विविध वर्गांचे केंद्र सरकारकडून मोफत लसीकरण होत असताना अनेक राज्यांनी आपल्यालाही लसीकरणाचे अधिकार द्या, तरूणांचेही लसीकरण महत्त्वाचे आहे, अशी मागणी केली. त्यांचा आग्रह लक्षात घेता त्यांनाही लसीकरणाची जबाबदारी देण्यात आली. परंतु काही काळातच राज्यांनी, केंद्र सरकारनेच लस खरेदी करावी म्हणून आग्रह धरला. अशा स्थितीत केंद्र सरकारने आता १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण, तेही मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. २१ जूनपासून याची अंमलबजावणी सुरू होईल. एक आठवडा आधीच राज्यांना त्यांना किती लसी मिळणार हे कळवले जाईल. त्यामुळे त्याचे नियोजनही करणे राज्यांना सहज शक्य होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

खाजगी लसीकरणासाठी द्या फक्त १५० रूपये जादा
भारतात तयार होणाऱ्या कोरोना (कोविड-१९) प्रतिबंधक लसींचे ७५ टक्के उत्पादन केंद्र सरकार खरेदी करेल. त्यातून हे मोफत लसीकरण करण्यात येईल. उरलेले २५ टक्के उत्पादन खाजगी हॉस्पिटलना खरेदी करता येईल. ज्यांना पैसे देऊन लस घ्यायची आहे ते लाभार्थी या हॉस्पिटलमधून लस घेऊ शकतील. त्यांना लसीच्या निर्धारीत दरापेक्षा अधिकचा १५० रूपये सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.
१० ते १५ लसी होणार उपलब्ध
देशात सध्या दोन लसी उपलब्ध आहेत. याशिवाय आणखी सात लसी बाजारात उपलब्ध होण्याच्या स्थितीत आहेत. त्याव्यतिरिक्त आणखी तीन उत्पादकांकडून लसींची अंतीम चाचणी सुरू आहे. याशिवाय परदेशांतून लस खरेदी करण्याच्या वाटाघाटीही सुरू आहेत. लहान मुलांना लस देण्याची चाचणीही दोन कंपन्यांकडून येथे सुरू आहे. नाकात स्प्रे मारून लस घेण्याच्या प्रकारावरही प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे देशातल्या जनतेने निर्धास्त राहवे, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.
८० कोटी जनतेला नोव्हेंबरपर्यंत फुकट धान्य
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यावेळी केंद्राने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेखाली ८० कोटी लोकांना दिवाळीपर्यंत मोफत धान्य दिले होते. दुसऱ्या लाटेतही दोन महिन्यांसाठी या योजनेखाली मोफत धान्य देण्याचे आम्ही जाहीर केले होते. आता ही योजना दिवाळीपर्यंत म्हणजेच येत्या नोव्हेंबरपर्यंत राबविली जाईल, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली.

