Homeमाय व्हॉईसफडणवीसांचे एका दगडात...

फडणवीसांचे एका दगडात तीन पक्षी!

 राज्यसभेवर महाराष्ट्रातून झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते, माया इवनाते, ज्योती वाघमारे, पार्थ पवार आणि शरद पवार यांची पुढील सहा वर्षांकरीता खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली. गेली सात वर्षे संसदीय कारकिर्दीपासून दूर असलेल्या विनोद तावडेंना भाजपाने राज्यसभेत नेले. नागपूरच्या अनुसूचित जातीच्या माजी महापौर इवनाते व सोलापूरच्या आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे यांना लॉटरी लागली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तर भाजपाच्या मदतीने विजयाची हॅट्ट्रिक संपादन केली. पार्थ पवार राज्यसभेवर जाणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. पण शरद पवारांच्या बिनविरोध निवडीने अनेकांचे डोळे विस्फारले. काहींचा जळफळाट झाला. काहींना आश्चर्याचा धक्का बसला. उबाठा सेना व काँग्रेसला हात चोळत बसण्याची पाळी आली. अकेला देवेंद्र क्या कर सकता है, असे विचारून काहींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पवारांच्या बिनविरोध विजयाचे श्रेय देऊन टाकले.

वयाच्या ८५व्या वर्षी तेही प्रकृती ठिक नसताना साहेबांना राज्यसभेत जाण्याची गरज काय, अशा प्रश्नावरून नाराजीला तोंड फुटले. राज्यसभा निवडणुकीसाठी ते आपला उमेदवारीअर्ज भरण्यासाठी विधान भवनातही येऊ शकले नव्हते. अगोदर काही दिवस पुण्याच्या रूबी हॉल इस्पितळात व नंतर मुंबईच्या ब्रीच कँडी इस्पितळात उपचारासाठी दाखल होते. मुंबईतील सिल्व्हर ओक, या निवासस्थानी त्यांच्या उमेदवारीअर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली. घरून उमेदवारीअर्ज सादर करणे महाराष्ट्रात प्रथमच घडले असावे. या वयात साहेबांना उभे राहता येत नसेल तर राज्यसभेत जाण्याचा एवढा सोस कशासाठी? अशी चर्चा त्यांच्यावर नाके मुरडणाऱ्यांकडून ऐकायला मिळली. सर्वोच्च न्यायालयाने १९६८मध्ये पशुपतीनाथ विरूद्ध हरिहरसिंग खटल्यामध्ये दिलेल्या निकालात प्रकृती किंवा इतर वैध कारणांसाठी उमेदवारअर्ज भरण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसेल तर घटनेच्या ८४ (अ) कलमान्वये विहित नमुन्यात शपथ घेणे बंधनकारक आहे. मुंबईच्या जे. जे. रूग्णालयाचे अधीक्षक संजय सुरवसे यांनी पवारांच्या घरी जाऊन सोपस्कार पूर्ण केले व नंतर सूचक जयंत पाटील यांनी त्यांचा उमेदवारीअर्ज विधान भवनाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.

फडणवीस

शरद पवारांच्या राजकीय जीवनाला नुकतीच साठ वर्षे पूर्ण झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विट करून त्यांच्या सार्वजनिक कारकिर्दीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पवारसाहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आगामी काळातही सर्वांना नवीन उर्जा देत राहो, हीच सदिच्छा,अशा शब्दांत सुनेत्रावहिनींनी साहेंबांविषयी आदराच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पवारांनी सार्वजनिक जीवनात संघर्ष करून व चाणक्यनीती वापरून भरपूर काही प्राप्त केले. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री झाले. केंद्रात संरक्षण व कृषी मंत्री झाले. लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावली. पवारांनी १९७८ साली वसंतदादांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवून पुलोद सरकारची स्थापना केली. त्यांनी आपल्या सरकारमध्ये तत्कालीन जनसंघ, शेकाप, समजवादी पक्षासह डाव्यांनाही सहभागी करून घेतले होते. १९९९मध्ये सोनिया गांधींच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसमध्ये बंड केले व राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. २०१९मध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद देऊन राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडी सरकार स्थापन केले.

२०२३मध्ये त्यांच्याविरोधात त्यांचे पुत‌णे अजित पवार यांनीच बंडाचा झेंडा फडकवला व चाळीस आमदारांसह ते भाजपासोबत महायुती सरकारमध्ये सामील झाले. पण त्यानंतरही त्यांचे काका-पुत‌णे म्हणून कौटुंबिक संबंध सलोख्याचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. पुतण्याच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर ते पुन्हा उभे राहिले. बारामतीत दोन आठवडे रोज हजारो लोक त्यांना भेटत होते. सकाळी सहा वाजल्यापासून लोकांच्या झुंडीच्या झुंडी गोविंद बागमध्ये येत होत्या. पवारसाहेब कधी हातात काठी घेऊन फिरताना दिसले नाहीत. येणाऱ्या सर्वांना ते भेटत राहिले. भेटणाऱ्या लोकांची गर्दी हेच त्यांचे टॉनिक आहे. म्हणूनच आजही सकाळी सहा वाजता त्यांचा कामाचा दिवस सुरू होतो. शरद पवार यांचा दरवाजा सर्वसामान्य जनतेसाठी आजही सकाळपासून खुला असतो.

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. विधानसभेत उबाठा सेनेचे २०, काँग्रेसचे १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे १० आमदार आहेत. विरोधी पक्षाच्यावतीने एकच जण राज्यसभेवर निवडून जाणार हे स्पष्ट होते. काँग्रेस व उबाठा सेना दोन्ही पक्ष या एका जागेवर शेवटपर्यंत आपला हक्क सांगत होते. राज्यसभा काँग्रेसने घ्यावी व विधान परिषद उबाठा सेनेने घ्यावी असा प्रस्ताव होता. काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा होती. पण उबाठा सेनेला प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेत पाठवायचे होते. साहेबच दिल्लीत हवेत म्हणून सुप्रिया सुळे आग्रही होत्या. काँग्रेस हायकमांडने राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांच्या नावाला होकार दिला व प्रदेश काँग्रेसची गोची झाली. हायकमांडने त्यांना विश्वासात घेतले नाही किंवा चर्चाही केली नाही. काँग्रेसने पाठिंबा जाहीर केल्याने उबाठा सेनेला साहेबांच्या नावाला पाठिंबा दिल्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. महाविकास आघाडीत वाद नको म्हणून आम्ही पवारांना पाठिंबा दिला असे आदित्य ठाकरेंना जाहीर करावे लागले.

फडणवीस

शरद पवार असतील तर आम्ही सातवा उमेदवार उभा करणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगून काँग्रेस व उबाठा सेनेची मोठी पंचाईत करून टाकली. संसदेत आणि संसदेबाहेर काँग्रेस व उबाठा सेना गौतम अदाणींना देशभर सर्व क्षेत्रातील एवढी कंत्राटे कशी मिळतात म्हणून हल्ले चढवत असतात. अशावेळी राज्यसभेत बिनविरोध निवडून गेलेले शरद पवार काय करणार आहेत? अदाणी पवार परिवाराचे वैयक्तिक मित्र आहेत. बारामतीत आर्टिफिशल इंटेलिजन्ससाठी भव्य वास्तू उभारण्यात येत आहे, त्याचे भुमिपूजन अदाणींनी केले. सुप्रिया सुळे यांनी तर त्या कार्यक्रमात गौतम अदाणी हे आपले बंधू असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अदाणी या मुद्दयावर काँग्रेस व उबाठा सेनेला पवारांकडून विरोधाची अपेक्षा करता येणार नाही. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण झालेच तर पवार भाजपासोबत जातील का, याचीही काँग्रेस किंवा उबाठा सेनेला खात्री नाही. त्यामुळेच शरद पवारांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पाठिंबा दिला असला तरी भविष्यात त्याची परतफेड काय होईल, तसेच ते अदाणी व भाजपाविरोधी लढाईत आपल्याला किती साथ देतील याची काँग्रेस व उबाठा सेनेला शाश्वती नाही.

पवार परिवार जर एक आहे मग राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या  कोट्यातील एक जागा पार्थ पवार यांच्याऐवजी शरद पवारांना का नाही दिली? असा प्रश्न विचारला जात आहे. अजित पवारांचा पक्ष महायुतीत आहे. शरद पवार महायुतीत नाही, हे त्याचे उत्तर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या गुगलीमुळे आजोबा व नातू दोघेही आता राज्यसभेत दिसणार आहेत. भाजपाचे काँग्रेस व उबाठा सेना हे दोघेही राजकीय शत्रू आहेत. दोन्ही पक्षांचे कोणीही राज्यसभेत जाणार नाही, ही खेळी फडणवीस यांनी यशस्वी करून दाखवली आहे. उबाठा सेनेच्या हातून राज्याची आणि महापालिकेची सत्ता गेलीच पण राज्यसभेवरही कुणाला पाठवता आले नाही, अशी नामुष्की आली.  शरद पवारांच्या बिनविरोध विजयामागे काँग्रेस, उबाठा सेना आणि भाजपाचेही योगदान आहे. शरद पवारांना राज्यसभेवर जाण्याचा या वयात सोस कशासाठी, असा प्रश्न विचारणाऱ्यांनाही साहेब एक अजब रसायन आहेत, हे मान्य करावे लागते.

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

महाराष्ट्र मोजतोय दर मिनिटाला ९ कोटींचे व्याज!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा २०२६-२७चा ७ लाख ६९ हजार ४६७ कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला. अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. पण अजितदादांचे अर्थ खाते मुख्यमंत्र्यांनी त्यांना न देता स्वत:कडे ठेवले व...

केवळ खुर्चीसाठी भाजपाने केले केजरीवालांविरूद्ध कटकारस्थान!

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे (आप)चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना भ्रष्टाचारी म्हणून भाजपाने जंगजंग पछाडले. गेले चार वर्षे भ्रष्टाचाराचा महमेरू म्हणून त्यांच्यावर चिखलफेक केली. दिल्लीचे मुख्यमंत्री असताना पोलिसांनी त्यांना घरात घुसून अटक केली. तब्बल १८० दिवस जेलमध्ये...

विधिमंडळाच्या अधिवेशनात जाणवते अजितदादांची उणीव…

 राज्य विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नेहमी रूबाबात येणारे आणि लाखोंची उर्जा व प्रेरणा असलेले अजित पवार नाहीत, हे अजूनही अनेकांना सहन करता आलेले नाही. अजितदादांचे विधानभवनातील आणि मंत्रालयातील कार्यालय लोकांच्या गर्दीने नेहमीच फुललेले दिसायचे. नेहमी वेळेवर येणारे, प्रत्येकाला...
Skip to content