यजमान स्पोर्टिंग युनियनसह एकूण ८ संघांचा सहभाग लाभलेली ४ थी अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आज, २८ फेब्रुवारीपासून ६ मार्च या कालावधीमध्ये खेळविली जाणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेची मान्यता असणारी स्पर्धा साखळी आणि बाद फेरी या तत्त्वावर घेतली जाईल. या स्पर्धेला कल्याणदास मेहता मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेम इंडिया प्रा. लि. यांचे सहाय्य लाभले आहे. एमसीएचे कार्यकारीणी सदस्य संदीप विचारे आणि दिपेन पारेख यांनीदेखील मदतीचा हात स्पर्धेला देऊ केला. स्पर्धेतील सामने मुंबईच्या माटुंगा जिमखाना आणि न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या मैदानात होतील.
स्पर्धेतील ८ संघांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक संघाला कमीतकमी ३ सामने खेळण्याची संधी मिळणार असल्याचे स्पर्धेच्या आयोजक, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त, भारताच्या माजी महिला कसोटीपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अरुंधती घोष यांनी सांगितले.
गटातील दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेतील साखळी सामने २८, २९ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी होतील. उपांत्य फेरीच्या लढती ५ मार्चला रंगणार आहेत. अंतिम फेरीचा सामना ६ मार्च रोजी खेळवण्यात येईल. प्रत्येक सामन्यामधील सर्वोत्तम खेळाडूला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात येईल. तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंना विशेष पुरस्कार देण्यात येतील. भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडू संगीता डबीर, सुनिता कनोजिया यांच्या हस्ते स्पर्धेचा उद्घघाटन समारंभ संपन्न होईल.
स्पर्धेतील संघांची गटवार विभागणी
“अ” गट- स्पोर्टिंग युनियन, माटुंगा जिमखाना, साईनाथ स्पोर्ट्स, नॅशनल
“ब” गट- युरोपेम, ओरिएंटल सी. सी., एम. आय. जी., डॅशिंग स्पोर्ट्स