ग्रुप फोटो काढताना ज्येष्ठ आमदारांना पाच हजारी, तीन हजारी मनसबदारांच्या रांगेत उभे केल्याने तसेच मुख्यमंत्रीच फोटोसाठी न आल्याने विधानसभेत गुरुवारी मानापमानाचे नाट्य रंगले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूरमधील हे शेवटचे अधिवेशन असल्याने विधानसभेच्या सर्व सदस्यांचे समूह छायाचित्र म्हणजेच ग्रुप फोटो घेण्याची परंपरा आहे. या परंपरेमध्ये यंदा प्रथमच मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष उपस्थित न राहिल्याने १०.५० ऐवजी १२ वाजता फोटो घ्यावा लागला आणि मानापमानाचे नाट्य घडल्याने १०.५०चा कार्यक्रम रद्द करून तो बारा वाजता घ्यावा लागला.

विधानसभेत या मानापमानाचे वाग्युद्ध रंगले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह नाना पटोले, जयंत पाटील आणि भास्कर जाधव यांनी सरकारला धारेवर धरले. नाही तरी आज फोटो नाही होत तर मंगळवारी समूह छायाचित्र घेऊ, कारण अशोकराव चव्हाण सभागृहात नाहीत, याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणीस यांनी सांगितले की, आज सगळे इतके नटूनथटून फोटोसाठी आले आहेत, तर आजच फोटो घेऊ.
नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीच फोटोसाठी आले नाहीत, याबद्दल जाब विचारला. तसेच, मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी राहिली आणि आता तुम्ही कधी फोटो घेणार, असे विचारले. त्यावर फडणवीस म्हणाले की, नाना तुम्ही त्या रिकाम्या खुर्चीवर बसला असता तर आम्ही तुम्हाला फोटोपुरते का होईना पण मुख्यमंत्री मानले असते. त्यानंतर मग १२ वाजता फोटो घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सारे सदस्य फोटोसाठी विधानभवनातील पायऱ्यांवर जमा झाले. तेव्हा मात्र खेळीमेळीच्या वातावरणात छायाचित्रे घेण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय श्रीरामच्या घोषणा देत समूह छायाचित्र घेण्यात आले. रोज पायऱ्यांवर विरोधी पक्ष निदर्शने करतात. पण आज समूह छायाचित्राच्या निमित्ताने सत्ताधारी पक्षांचे आमदारही घोषणांमध्ये सहभागी झाले होते.