पवारसाहेबांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमणूक केली त्यात प्रफुल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. तुम्हाला जो सह्यांचा अधिकार दिला तो शरद पवार यांनी.. मग त्यांचे अधिकार अमान्य का करता? पक्षच तुमचा आहे, सगळेच तुमचे आहे तर फेरनिवड कशाला करता? राष्ट्रीय निवडणूक समिती आहे त्यांना न सांगता तुम्ही पक्षाध्यक्षांची निवड कशी करू शकता, असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले.
आम्हीच नेमणूक केली आहे असे ते सांगत असतील तर तुम्ही नेमणूक केली नाही हे आमचं म्हणणंच नाही. आमच्याकडे त्याबाबतचे पत्र आहे. खासदार, आमदारांच्या पक्षविरोधी कारवाया लक्षात आल्यावर पक्षाबाहेर काढण्याचा अधिकार हा अध्यक्षांना असतो. त्याचा वापर वर्कींग कमिटीला करता येतो. तो कालच्या बैठकीत करण्यात आलेला आहे असेही त्यांनी सांगितले.
१५ सप्टेंबर २०१७चे पत्र दाखवतानाच शरद पवार यांना कोणताच अधिकार नाही म्हणता मग तुम्हालाही अधिकार नाही. तुमची नेमणूकच त्यांच्या अधिकारात झाली आहे. संविधानाला मानणारे आणि संसदेत काम करणार्या एनजीओंच्या लक्षात आले पक्षातरांचा वापर करून सत्तेमध्ये मोठी हेराफेरी होते तेव्हा यावर कुठेतरी आळा घातला पाहिजे. म्हणून १९८५ साली ५२वी घटनादुरुस्ती झाली. त्यातून दहावे शेड्युल जन्माला आले. ४० आमदारांनी व्हीप लागू झाला तर ती आई आणि मुलाची नाळ असते. पक्षाचा वापर फक्त निवडणूक एबी फॉर्म मिळवण्यासाठी, निधी मिळविण्यासाठी नेतृत्त्वाच्या वलयाचा वापर करून निवडून येत असतात आणि मग अचानक सांगायचे आम्ही चाललो हे योग्य नाही, असेही आव्हाड म्हणाले.
तुमच्याकडे दोन तृतीयांश लोक आहेत तर मर्ज करा. तुम्हाला भाजपचे दरवाजे उघडे आहेत की? तुम्ही ३० जूनला बैठक झाली सांगता, मग त्यातील लोक कुठे कुठे होते हे तरी माहीत आहे का? बैठक कुणाच्या नेतृत्त्वाखाली झाली. ३ जुलैला घेतलेल्या पत्रकार परिषदेत किटी पार्टीने बैठक कधी आणि किती वाजता घेतली. निवडणूक आयोगाला कधी कळवले? इतका उशीर का लागला कळवायला? याचे पुरावे काय आहेत, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

