ऊन नका देऊ नेत्याला!

ऊन नका देऊ, नेत्याला.. ऊन नका देऊ.. तसं पाहिलं तर दिवाळीचे दिवस होते. त्यातच उमेदवारीअर्ज भरण्याचीही राजकीय पक्षांची घाई होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत ठाण्याच्या कोर्ट नाका परिसराची भेटच झालेली नव्हती. आज सकाळी दररोजसारखी वाहतूककोंडीही दिसत नव्हती म्हणून म्हटले, आज आपली आवडती कोर्ट परिसर भेट ठेवूचया! काय नशीब होते बघा. बसस्टॉपवर आलो तोच चक्क वाटानुकूलित बस सेवेशी हजर! तिकीट काढले व जरा विसावलो. सेंट्रल मैदान स्टॉप गेला आणि उभा राहिलो.. बस कोर्ट नाक्याकडे वळली आणि आश्चर्याचा झटकाच बसला. जिल्हाधिकारी कार्यालयाला बाहेरूनच पांढऱ्या रंगाचे पडदे चकाचक स्वरूपात लावले होते. जणू काही जिल्हाधिकारी कार्यालय पडदानशीन झाल्यासारखे दिसत होते. कार्यालयाच्या मुख्य दरवाजातून आत जाताच निवडणुकीची लगबग जाणवली. कधी नव्हे तो सुरक्षा अधिकारी गाडयांना आत घेण्यास नकार देत होते. दुसरे आश्चर्य म्हणजे नकार ऐकताच मागच्या गाडीतून लगबगीने पीए किंवा बाह्या सरकवत कार्यकर्तेही बाहेर आलेले दिसले नाहीत. मग लक्षात आले की अरे ही तर निवडणुकीची झलक आहे. निवडणूक या पाच अक्षरांनी सर्वांना सुतासारखे सरळ केलेले दिसले. मनातून सुखवलो. पण आत जाताच गाड्यांचा प्रचंड ताफा पाहून काहीसा हिरमूसलोही!

नेत्यांना ऊन लागू नये म्हणून..

जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो तर जवळजवळ सर्व कार्यालयाला टॉवेल गुंडाळतात तसे पडद्यात गुंडाळलेले दिसले. आजूबाजूला चौकशी केल्याशिवाय राहवले नाही. यह सफेद कपडा किसलीये भाई? त्यावर त्याने चक्क मराठीत सांगितले की, अर्ज भरायला येणाऱ्या राजकीय नेत्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हूणन? मनात आले की आपले राजकीय नेते गेल्या २० वर्षांपासून उन्हात फिरलेले कुणी पाहिले आहेत काय? जवळजवळ सर्वांकडे चांगल्या गाड्या आहेत. थोडे मोठे आहेत त्यांच्याकडे एसयुव्ही आहेत आणि त्यापेक्षाही मोठे आहेत त्यांच्याकडे परदेशी बनावटीच्या आलिशान गाड्या आहेत. सांगायचे विसरलो. या सर्व प्रकारच्या गाड्या बेफाट कूल असतात. आपल्या नेत्यांना उन्हाचा कधी त्रासच होत नसतो. कारण ‘गरमी’वर त्यांच्याकडे जालीम उपाय असतो. आता इतक्या गारेगार वातावरणातून जनतेला ‘गार’ करण्यासाठी निघालेल्या नेत्यांना पाच मिनिटे सूर्यदेवाची गरम किरणे लागली तर काय पाप लागणार आहे? पण आमचे जिल्हाधिकारी कोमल हृदयाचे असल्याने ही सर्व पडद्यांची व्यवस्था केलेली असावी.

पांढरा रंग किरणे परावर्तीत करतो असे आठवी-नववीत शिकलेले आठवले आणि मेंदूत लख्ख प्रकाश पडला. प्रकाशाबरोबर एक जुने गाणे आठवले. मालती पांडे ते गाणं म्हणत असत. “कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू..” तान्हया बाळाची झोपमोड होऊ नये म्हणून एक माय सर्वांना विनवीत आहे. अरे सर्वांनो पाय न वाजवता (न आपटता) आत या .आताच बाळाचा डोळा लागला आहे, त्याची झोपमोड व्हायला नको. मायच ती, सर्वांना सांगते, चिमणीला सांगते, गायीलापण सांगते. तू हळूच हंबर! आता कोर्टनाका परिसर म्हटला की हॉर्नचे आवाज येणारच. ते कोण थांबवणार! तसेच नेत्यांच्या तसेच निवडणूक कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गाडयांनाही किरणांचा तडका बसू नये म्हणून नवीन छप्परही उभारण्यात आलेले आहे. बिसलेरीच्या थंडगार बाटल्या तसेच साध्या बाटल्यांचे तर अनेक खोके (पुन्हा खोके) दिसत होते.

नियोजन भवनात उभारलेल्या निवडणूक कक्षात सर्वांचीच लगबग होती. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून घेण्यात येणाऱ्या या निवडणुकीनंतर तरी सुखाचे दिवस येतील का, हा आम जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे. हे सुख जर मिळणार असेल तर जनताही एक सुरात म्हणेल.. “ऊन नका देऊ नेत्याला, ऊन नका देऊ..!”

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content