मला विरोधी पक्षनेतेपदामध्ये कधीही स्वारस्य नव्हते आणि आजही नाही. मला या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्षाच्या संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या… मी त्याला न्याय देईन, अशी जाहीर मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जालेल्या मेळाव्यातच केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधली खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असल्याचे बोलले जाते.
शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीचा वर्धापनदिनाचा मेळावा पार पडला. त्यात ते बोलत होते. आमदारांच्या आग्रहाखातर आपण विरोधी पक्षनेता झालो, असेही ते म्हणाले. शिवाजीपार्कची सभा झाली. त्यावेळी आम्ही पस्तीशीत होतो. त्यावेळी आम्ही ज्युनिअर म्हणून ओळखले जात होतो. या कालावधीत अनेकजण आले आणि सोडून गेले. दर २५ वर्षांनी नवी पिढी पुढे येत असते. मधल्या काळात भाकरी फिरवली पाहिजे असे सांगितले गेले. पक्षाने लहानात लहान कार्यकर्त्याला संधी दिली आहे. बरेच जण मंत्री होतात. परंतु ते स्वतःव्यतिरिक्त इतर कोणालाही आमदार म्हणून निवडून आणू शकत नाहीत. त्यांनी काम करायला हवे. भाषणे देऊन पहिला नंबर येणार नाही, असेही अजितदादा म्हणाले.
राष्ट्रवादीच्या हातात एकहाती सत्ता का नाही? इतर नेत्यांपेक्षा शरद पवार उजवे आहेत. तरीही आपण का कमी पडलो? मुंबईत सर्वात कमी आपण आहोत. मुंबईत अद्यापही अध्यक्ष नाही. मुंबईत पक्ष का वाढला नाही याचादेखील विचार केला पाहिजे. अनेक ठिकाणी संघटनात्मक बदल झाले पाहिजेत. भाकरी फिरवावयाची झाली तर फिरलीच पाहिजे. नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात नुकतेच दोन कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती केली. या पदांवर त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नेमणूक केली. त्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चाही समोर आल्या होत्या. या सर्व घटनेनंतर अजित पवार नाराज नाहीत, असे शरद पवारांनी सांगितले होते. अजित पवार यांनीही आपण नाराज नसल्याचे सांगितले होते. पण आज अजित पवार यांनी मनातील खंत बोलून दाखवली. जयंत पाटील गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. प्रत्येक तीन वर्षांनंतर पद बदलण्याची तरतूद पक्षाच्या घटनेत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या या भूमिकेनंतर शरद पवार कोणते पाऊल टाकतात, याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

