Homeमुंबई स्पेशल... तर इमारत...

… तर इमारत बांधताना ‘मियावाकी वन’ बंधनकारक!

मुंबईतल्या हरित क्षेत्रात वाढ होण्यासाठी १० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावरील इमारतीचे बांधकाम करताना विकासकाला मियावाकी वन विकसित करणे बंधनकारक करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील हरित क्षेत्रात वाढ होण्यासह पर्यावरणाचे संवर्धन व्हावे; यासाठी पालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार पालिकेने हा निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रातील पर्यावरणावर अत्यंत सकारात्मक परिणाम करणाऱ्या या निर्णयांतर्गत १० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावर इमारतीचे बांधकाम करताना भूखंडाच्या खुल्या क्षेत्रावरील काही भागात ‘मियावाकी वन’ (Miyawaki Plantation / Urban Forest) विकसित करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. अत्यंत कमी जागेत अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याच्या या पद्धतीमुळे महापालिका क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनास निश्चितच गती मिळेल, असा विश्वास उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १० हजार चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर इमारत बांधताना विकास नियंत्रण नियमावलीच्या संबंधित नियमांनुसार निर्धारित आकाराची जागा ही ‘खुले क्षेत्र’ (LOS : Layout Open Space) असणे बंधनकारक आहे. यानुसार खुल्या क्षेत्रासाठी जेवढी जागा निर्धारित करण्यात येईल, त्या जागेच्या ५ टक्के इतक्या आकाराचे ‘मियावाकी वन’ विकसित करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. हे ‘मियावकी वन’ विकसित करण्यासाठी संबंधित विकासकाला काही तांत्रिक मार्गदर्शन लागल्यास त्याची माहिती उद्यान खात्याद्वारे देण्यात येणार आहे, असे परदेशी यांनी सांगितले.

या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाला ‘बांधकाम परवानगी’ (आय ओ डी / I.O.D.) विषयक अटींमध्ये मियावाकी वन विकसित करण्याच्या अटींचा समावेश करण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणाऱ्या या वनांमधील झाडे अधिक वेगाने वाढतात. एरवी सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो, त्यातुलनेत साधारणपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधीत तेवढ्याच उंचीचे झाड वाढते. साधारणपणे २ वर्षांत विकसित होणाऱ्या मियावाकी पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर कमी असल्याने ती घनदाट असतात.

या वनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीची साधारणपणे दोन किंवा तीन वर्षे या वनांची नियमित देखभाल करावी लागते. त्यानंतर ही वने नैसर्गिकरित्या वाढत राहतात आणि आपल्याला अव्याहतपणे प्राणवायू देत राहतात. ही बाब लक्षात घेतल्यास मुंबईतील मियावाकी वनांना मुंबई महानगराची फुफ्फुसे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Continue reading

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...
Skip to content