Homeटॉप स्टोरीतब्बल ३१८ प्रश्नांनंतर...

तब्बल ३१८ प्रश्नांनंतर संपली सुनील प्रभूंची उलटतपासणी!

तब्बल ३१८ प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून चाललेली उलटतपासणी आज दुपारी संपली. आजही पुन्हा सुनील प्रभू यांनी अध्यक्षांच्या परवानगीने एका मुद्द्यावरील साक्ष बदलली.

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची उलटतपासणी संपल्यानंतर दुसऱ्या सत्रात शिवसेनेच्या विधानभवनातल्या कार्यालयातले कर्मचारी विजय जोशी यांची उलटतपासणी सुरू झाली. महेश जेठमलानी हेच विजय जोशी यांनीच त्यांची उलटतपासणी घेतली. शिंदे गटाकडून होणारी होणाऱ्या उलटतपासणीचा आजचा अखेरचा दिवस होता.

शिंदे गटाने दाखल केलेल्या अर्जावर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी उत्तर दिले. ज्या ईमेल आयडीवर ठाकरे गटाने २२ जून २०२२ रोजी ईमेल पाठवला तो कधीच वापरला गेला नाही, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. त्यावर, शिंदे गटाने जानेवारीत दाखवलेल्या नोंदवहीतील ई मेल आयडीवरच मेल पाठवल्याचे कामत यांनी सांगितले. हा इमेल आयडी बनावट असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला. आपल्या प्रतिज्ञापत्रानुसार २५ जून २०२२ रोजी कुठलीही राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा प्रतिनिधी सभा झाली नाही. तसेच कुठलाही ठराव त्यात संमत झाला नाही.या बैठकीची कोणतीही नोटीस प्रतिवाद्यांना देण्यात आलेली नव्हती. शिवसेनेनेमध्ये पक्षप्रमुख या नावाचे पदच अस्तित्त्वात नाही किंवा या पदावरील व्यक्तीचे निर्णय बंधनकारक नाहीत, असेही जेठमलानी म्हणाल्याचे समजते. त्यावर प्रभू यांनी हे सर्व ऑन रेकॉर्ड आहे.

सुनील प्रभू

प्रभू तुम्ही २४ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे व १५ आमदार यांच्याविरोधात अपात्रता याचिका दाखल केलेली आहे. मग उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी ३० जूनपर्यंत वाट का पाहिली, असा सवाल जेठमलानी यांनी केला. त्यावर प्रभू यांनी आपल्याला काही आठवत नसल्याचे सांगितले, असे कळते.

आपण शिवसेना आमदारांना ४ जुलै २०२२ रोजी शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली चाललेल्या सरकारविरोधात मतदान करण्याचा व्हिप का काढला, असा सवाल जेठमलानी यांनी केला. तेव्हा ज्या आमदारांना व्हिप बजावला होता, त्यांनी पक्षविरोधी कृत्य केले होते. महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली होती, त्यामुळे तो विश्वासदर्शक ठराव होता. महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करावे ही भूमिका होती. म्हणून पूर्ण वेळ उपस्थित राहून भाजपाने जो विश्वासदर्शक ठराव मांडला होता, त्याविरुद्ध महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देण्यासाठी मी व्हिप काढला होता, असे प्रभू म्हणाले.

नंतर त्यांनीच या उत्तरात अध्यक्षांच्या अनुमतीने सुधारणा केली. सर्वच आमदारांना व्हिप बजावला होता. काही आमदार पक्षविरोधी मतदान करणार होते, असे समजले. विश्वासदर्शक ठराव भारतीय जनता पक्षाने मांडला होता. या ठरावाला महाविकास आघाडीने विरोध दर्शवला होता. शिवसेना महाविकास आघाडी सोबत होती. म्हणून विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करावे व महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करावे म्हणून हा व्हिप काढण्यात आला होता, असे सुनील प्रभू यांनी सांगितले.

अशा विविध प्रश्नांच्या सरबत्तीनंतर सुनील प्रभू यांची उलटतपासणी संपली.

Continue reading

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...
Skip to content