Homeटॉप स्टोरीपोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेटवर...

पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेटवर मुख्यमंत्री ठाकरेंकडून पांघरूण?

राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटबद्दल गृह खात्याविरूद्ध असलेला पोलिसांचा अहवाल, स्वतःचे सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर पांघरूण घातले. इतकेच नव्हे तर तो गृह मंत्र्यांकडेच पाठवल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला. याबाबतचे सर्व पुरावे आजच आपण केंद्रीय गृहसचिवांकडे सोपवत असून त्यांच्याकडे या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

राज्य पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे कोट्यवधींचे रॅकेट चालवण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकारमध्ये होतो. आपल्यापूर्वी आर. आर. पाटील गृहमंत्री असल्यापासून पोलिसांच्या इंटलिजन्स युनिटच्या आयुक्तपदी रश्मी शुक्ला होत्या. या सरकारच्या काळातही त्या पदावर त्याच होत्या. त्यांच्याच यंत्रणेला ही माहिती मिळाल्यावरून २०१७ साली आपण मुख्यमंत्री असताना एका हॉटेलवर छापा मारून असे रॅकेट चालविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. या सरकारच्या काळातही तसेच रॅकेट चालू होते.

ते कळल्यावर रश्मी शुक्ला यांनी तेव्हाचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल तसेच त्यांच्यामार्फत तेव्हाचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सीताराम कुंटे यांची परवानगी घेऊन त्यांनी काही पोलीस अधिकारी, काही राजकीय नेते तसेच इतर काही जणांचे फोन टॅप केले. या संभाषणाची ६.३ जीबीचे रेकॉर्ड आपल्याकडे आहे. यातून मिळालेल्या अहवालाच्या आधारावर त्यांनी २५ ऑगस्ट २०२० साली  पोलीस महासंचालकांना या प्रकरणाची गुन्हा अन्वेषण शाखेकडून चौकशी करण्याची शिफारस केली. त्यांनी २६ ऑगस्ट २०२० रोजी हा अहवाल अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे पाठविला. त्यांच्याकडून तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला. परंतु त्यांनी यावर कोणतीही कारवाई न करता, कोणत्याही प्रकारची चौकशी न करता, ज्यांच्या निकटवर्तीयांचा यात सहभाग आहे, त्या गृहमंत्र्यांकडेच हा अहवाल पाठविला, असा आरोप फडणवीस यांनी केला.

या शिफारशीच्या मोबदल्यात गृह मंत्र्यांनी शुक्ला यांची बढतीच्या नावाखाली बदली करत मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय तयार करण्यात आलेल्या सिव्हिल डिफेन्सच्या महासंचालक म्हणून नेमणूक केली, असेही ते म्हणाले.

शरद पवार यांनाच पाडले उघडे

परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून दरमहा १०० कोटी उकळण्यासाठी सचिन वाझेचा वापर झाल्याचे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख १५ फेब्रुवारीपर्यंत रूग्णालयात तर नंतर त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानी क्वारंटाईन होते, असा दावा केला. त्यांच्या दाव्याचा खोटेपणा उघड करताना फडणवीस म्हणाले की, अनिल देशमुख १५ फेब्रुवारीला जेट विमानाने मुंबईत आले होते. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार १७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता ते सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये होते. २४ फेब्रुवारीला ते मंत्रालयात होते.

परमबीर सिंह यांनीही आपल्या पत्रात वाझेंनी फेब्रुवारीच्या अखेरीस देशमुखांची भेट घेतली होती. याचाच अर्थ विलगीकरणाच्या काळात देशमुख अनेक जणांना भेटले. आपल्या या भेटीगाठी त्यांनी शरद पवार यांच्यापासून लपवून ठेवल्या आणि पवार यांच्याकडून प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती पुरविली गेली. एका राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्याला देशमुख यांनी उघडे पाडले, असेही फडणवीस म्हणाले.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content