Homeटॉप स्टोरीमुख्यमंत्र्यांचे मुंबईत 'कोनीचिवा'...

मुख्यमंत्र्यांचे मुंबईत ‘कोनीचिवा’ आणि ‘एरिगेटो गोझामासू’!

महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पात इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कारचे उत्पादन होणार असून यासाठी २० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे सुमारे ८ हजार थेट आणि अप्रत्यक्ष ८ हजार अशी १६ हजारांची रोजगारनिर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून वर्षाला ४ लाख कारची निर्मिती होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ८५० एकर जागा देण्यात आली आहे. यावेळी मुंबईत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात जपानी भाषेत नमस्कार म्हणजे ‘कोनीचिवा’ असे संबोधून केली तर आभारदेखील ‘एरिगेटो गोझामासू’ अशा शब्दांत मानले.

मुंबईतल्या सह्याद्री अतिथिगृहात शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार निर्मितीच्या ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्ष मानसी टाटा, गीतांजली किर्लोस्कर, टाटा किर्लोस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझू योशीमुरा, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसी सीईओ विपिन शर्मा आदी उपस्थित होते.

एरिगेटो गोझामासू

टोयोटाच्या या प्रकल्पामुळे भारताच्या ई-कार निर्मितीत क्रांती येईल. राज्यशासनदेखील इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत असून सार्वजनिक वाहतूक यंत्रणेतदेखील अशा वाहनांचा वापर वाढवला आहे. गृहनिर्माण संस्थांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग केंद्रं उभारण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल केले आहेत. राज्यात सर्वोत्तम दळणवळण, कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि जागा उपलब्ध आहे. टोयोटाचे आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान आणि आमचे कुशल मनुष्यबळ याची येथे चांगली सांगड होईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात अनेक ऑटोमोबाईल सेक्टर आहेत. पण टोयोटा नसल्याने ते अपूर्ण होते. आता राज्यात टोयोटा असल्याने हे सेक्टर पूर्ण झाले आहे. मराठवाड्यातील चेंबर ऑफ कॉमर्स समूह या उद्योगासाठी शासनाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करेल. या गुंतवणुकीमुळे मराठवाड्यात रोजगारनिर्मिती तर होणारच आहे पण आर्थिक प्रगतीही साध्य होणार आहे.

यावेळी मसाकाझु योशीमुरा यांनीदेखील आपल्या मनोगतात महाराष्ट्राची निवड या प्रकल्पासाठी करण्यामागची करणे सांगितली. भारत आणि महाराष्ट्राच्या समग्र विकासात टोयोटादेखील एक भागीदार बनू इच्छिते. देशाशी गेल्या अडीच दशकापासून आमचे संबंध असून ते या प्रकल्पाच्या अजून वाढीस लागतील असेही म्हणाले. मानसी टाटा यांनीदेखील यावेळी राज्यशासनाचे या प्रकल्पासाठी सहकार्य मिळाल्याबद्धल आभार मानले.

Continue reading

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....

17 मार्चला मुंबईत टपाल पेन्शन अदालत

मुंबईच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांनी टपाल विभागातल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटूंब वेतनधारकांसाठी येत्या 17 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता टपाल पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांच्या कार्यालयात ही पेन्शन अदालत घेतली जाईल. महाराष्ट्र आणि...

तत्काळ पासपोर्टसाठी पुण्यात 7 तारखेला विशेष मोहीम

पुण्यातल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने तत्काळ श्रेणीतल्या अर्जदारांसाठी पुण्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात येत्या शनिवारी, 7 फेब्रुवारीला विशेष पासपोर्ट मोहिमेचे आयोजन केले आहे. पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट लवकर मिळवून देण्यासाठी आणि तातडीच्या प्रवासाची गरज असलेल्या नागरिकांना पासपोर्ट सेवा पुरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने हा...
Skip to content