महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा नेते पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतचे एक निवेदन देण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे राज्यसरकारकडून पत्रव्यवहार केला जाईल आणि सर्व चौकशी सीबीआयमार्फत करण्याची विनंती केली जाईल, असे आश्वासन दिले.
या निवेदनात मांडलेले महत्त्वाचे मुद्दे:
या प्रकरणात गंभीर अनियमितता आणि संशयास्पद परिस्थिती आहे. नोंदवलेले आणि गोळा केलेली विविध तथ्ये, महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतात. याशिवाय उड्डाण क्रू रचनेत शेवटच्या क्षणी झालेले बदल, ज्यासाठी ऑपरेशनल निर्णय घेण्याची आणि अधिकृततेची तपासणी आवश्यक आहे, हवाई वाहतूक नियंत्रण संप्रेषण आणि धावपट्टीच्या मंजुरीच्या क्रमवारीशी संबंधित स्पष्ट विसंगती, गंभीर ऑनबोर्ड सुरक्षा चेतावणी प्रणालींच्या कार्यप्रणाली आणि अखंडतेबद्दल चिंता, लँडिंग टप्प्याच्या जवळ असूनही कोणत्याही रेकॉर्ड केलेल्या संकट संप्रेषणांची अनुपस्थिती, क्रू फिटनेस, देखभाल, अनुपालन आणि विमान प्रणालींसह फॉरेन्सिक मूल्यांकन आवश्यक असलेल्या बाबी आदींचाही तपासात समावेश व्हावा, असे या निवेदनात म्हटले आहे.

ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली त्याचवेळी संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री नायडू, मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. यापूर्वी अशा घटनांसाठी स्वायत्त यंत्रणा नेमलेल्या आहेत. त्या यंत्रणांनी तपास सुरू केल्याचे घोषित केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. स्वायत्त यंत्रणा तपास करत आहे. पण सीबीआय तपास करत असताना आणखी व्यापकतेने तपास होऊ शकतो. ज्यावेळी स्वायत्त यंत्रणा तपास करत असतात त्यावेळी बाह्य देशातील यंत्रणाही अपघाती प्रकरणाचा तपास करत असतात. अशावेळी जे काही मुद्दे उपस्थित होत आहेत त्या सर्व मुद्द्यांचा तपास व्हावा आणि निष्कर्ष लवकरात लवकर राज्यातील नव्हे तर देशातील जनतेसमोर आणावा ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
आमदारांची नाराजी नाही
राज्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुती म्हणून कशा पध्दतीने वाटचाल करु शकतो याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासोबत आज भेट झाली. त्यात भाजपला काय वाटते आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची काय भूमिका आहे याबद्दल चर्चा झाली. ही चर्चा समाधानकारक व सौहार्दाची झाली असून भाजप आमचा एनडीएमधील प्रमुख पक्ष आहे, असेही ते म्हणाले. पक्षाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत आमदारांच्या नाराजीबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. अतिशय एकत्रितपणे, एकसंघपणाने विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या धिरोदत्तपणाने, संयमाने योग्य ती भूमिका घेत वहिनी उपमुख्यमंत्रीपदावरून संघटनेची धुरा वाहत आहेत त्याबद्दल विश्वासही व्यक्त करण्यात आला. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावे आणि पक्षसंघटना मजबूत करावी हेच बैठकीचे सार होते असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

