दहावीच्या परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे महानगरपालिका शाळेतील पहिल्या २५ विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील पाच वर्षांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी किमान रुपये २५ हजार आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. गेल्या वर्षी शैक्षणिक वर्षात पालिकेच्या शिक्षण विभागाने नवीन प्रवेशाकरिता ‘मिशन ॲडमिशन, एकच लक्ष्य – एक लक्ष’ ही मोहीम राबविल्यामुळे १ लाखापेक्षा जास्त प्रवेश निश्चित झाले होते. त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याकरीता पालिकेने २०२३-२४साठी ‘मिशन मेरीट’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२३मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यात मुंबई महापालिकेच्या एकूण ४३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. तर पालिकेच्या सर्व शाळांचा सरासरी निकाल ८४.७७ एवढा लागला. पालिकेच्या शाळांमधून गुंदवली एमपीएस शाळेचा विद्यार्थी शुभम अवधेश सिंग ९५.२० टक्के गुणांसह अव्वल आला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२३मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेला पालिकेच्या २४५ माध्यमिक शाळांमधून १७ हजार १४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ हजार ५२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ५० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. पालिकेच्या शिक्षण विभागाने दहावीच्या निकालवाढीसाठी विद्यार्थ्यांची तयारी करुन घेताना अत्यंत सोप्या व मोजक्या आशयाच्या ‘मिशन-३५’ पुस्तिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्या होत्या.
विद्यार्थ्यांचा अधिकाअधिक सराव होण्याकरिता डिसेंबर २०२२पासून बोर्डाच्या धर्तीवर शालेय स्तरावर सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या होत्या. याशिवाय अधिकाऱ्यांना शाळा दत्तक देऊन मार्गदर्शन करण्यात आले होते. तसेच शिक्षक आणि विद्यार्थांसाठी व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी, शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षणीय यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय साधून वेळोवेळी सहविचार सभाही घेण्यात आल्या. शिवाय, र्व्हच्युअल क्लास रुममार्फत (व्हिटीसी) तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.

