महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तब्बल चाळीस मिनिटांचे भाषण करून मराठा आरक्षण देतानाच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ही मागणी आज विधानसभेत केली. ती करताना मराठा समाजाला सरकारमध्ये, नोकऱ्यांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळाल्याचेही आकडेवारीनिशी मांडले. बीडमध्ये आमदारांची घरे पेटवली जात असताना तुम्ही गेला असतात, तर मला बरे वाटले असते, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांगत छगन भुजबळांनी सिद्ध केले, ते आहेत चँम्पियन ऑफ ओबीसी कॉज…
भुजबळ यांनी चव्हाण यांना काही प्रश्न विचारले. मनोज जरांगे पाटील यांना कोणालाही गावबंदी करू नका, हे सांगायला गेलात का… नाही. भुजबळांना सातत्याने धमकावले जात असताना असे करू नका, हे तुम्ही जरांगे यांना सांगितलेत का… नाही. अमुक तारखेपर्यंत आरक्षण द्या, असे सरकारला धमकावू नका, असे जरांगे पाटील यांना सांगायला गेलात का… नाही. समाजात दहशत माजवू नका, जाळपोळ करू नका, हे सांगायला तुम्ही गेलात का… नाही.

सारथी, या मराठा समाजातील तरुणांना शिष्यृत्तीसह विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी स्थापित संस्थेला राज्यात विविध शहरात एक रुपया लीजने जमिनी देऊन इमारती उभ्या केल्या जात आहेत. पण, महाज्योती संस्थेला जागा दिल्या जात नाहीत. महाराष्ट्रात सर्वाधिक संख्येने मुख्यमंत्री मराठा समाजातील झाले आणि त्यांचेच महाराष्ट्राच्या राजकारणातही वर्चस्व आहे, याकडेही भुजबळ यांनी लक्ष वेधले.
रानडुकरांचे करावे फ्यामिली प्लानिंग
भटक्या कुत्र्यांपासून होणाऱ्या त्रासाचा मुद्दा आमदार मनीषा चौधरी यांनी औचित्त्याच्या मुद्द्याद्वारे बुधवारी विधानसभेत उपस्थित केला. त्यांच्या मतदारसंघात मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे अनेक रहिवासी त्रस्त झाले आहेत, असे सांगून त्या म्हणाल्या की, प्राण्यांबद्दल काम करणाऱ्या संस्थांना इतका कळवळा असेल तर त्यांनी आपल्या घरी या मोकाट कुत्र्यांना पाळावे. रानडुकरे आणि इतर जंगली प्राणी हरभरा पिकांचे नुकसान करत असून या जनावरांचे फँमिली प्लानिंग करावे, अशी मागणी हरीश पिंपळे यांनी केली.