Homeडेली पल्समहाराष्ट्रात मुख्यमंत्री व...

महाराष्ट्रात मुख्यमंत्री व २ उपमुख्यमंत्री असतानाही महिलांवर अत्याचार

राज्याला एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असूनही ते महिलांना न्याय देऊ शकत नाहीत. राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. यातून लहान मुलीही सुटलेल्या नाहीत. गुन्हेगारांवरच अंकुश राहिला नसल्याने राज्यातील परिस्थिती बिकट बनली आहे, असा आरोप महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी काल केला.

मुंबईत टिळक भवनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना संध्या सव्वालाखे यांनी महायुती सरकारवर तोफ डागली. बदलापूरमध्ये तीन, साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचाराच्या घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे. गुन्हा नोंदवण्यासाठी पीडित मुलीच्या आईला पोलीसस्टेशनमध्ये १२ तास बसवून ठेवले, पोलिस दबावाखाली होते असे स्पष्ट दिसते. ज्या शाळेत हा गुन्हा घडला त्या शाळेतील संबंधित लोकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

ही घटना १२ तारखेला घडली व १५ तारखेला मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी बदलापुरात होते. पण त्यांच्यापर्यंत ही माहिती का पोहोचली नाही? राज्यातील महिला अत्याचाराच्या एका घटनेत तपास करून दोन महिन्यांत आरोपीला फाशी दिली, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी काल एका कार्यक्रमात सांगितले. ही घटना कोणती व कोणाला फाशी दिली त्याचा खुलासा करावा व बदलापूरच्या नराधमालाही तातडीने फाशी द्यावी, असेही सव्वालाखे म्हणाल्या.

महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूरमध्ये झालेल्या लहान मुलींवरील अत्याचाराची माहिती घेतली व पोलीसस्टेशनला भेट देऊन तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. बदलापूरच्या घटनेने देश हादरला. पण राज्य महिला आयोगाने तीन-चार दिवस या घटनेची दखलही घेतली नाही. त्या कुठे होत्या? हे काम बाल हक्क आयोगाचे आहे, माझे नाही, असे उद्धट उत्तर त्यांनी दिले. अशा बेजबाबदार व निष्क्रीय व्यक्तीने पदाचा राजीनामा द्यावा. भाजपाच्या चित्रा वाघ यांनीही बदलापूरच्या लहान मुलीबद्दल एक शब्दही काढला नाही. उलट कोलकात्याच्या घटनेवर त्या बोलत आहेत. बदलापूरच्या माजी नगराध्यक्षाने एका महिला पत्रकाराला अश्लिल भाषा वापरली. या महिला पत्रकाराचा दोन दिवस गुन्हा नोंद करुन घेतला नाही. या माजी नगराध्यक्षला अटक करा, अशी मागणीही सव्वालाखे यांनी केली.

बदलापूरसारख्याच घटना अकोला, नाशिक, ठाणे जिल्ह्यात घडल्या आहेत. राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना व निष्क्रीय सरकार लक्षात घेऊन प्रदेश महिला काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात नारी न्याय समिती स्थापन करणार आहे. या समितीत एक महिला वकील व पाच महिला सदस्य असतील, पीडित महिलांना सर्व प्रकारची मदत तसेच समुपदेशन करण्याचे काम ही समिती करेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content