लातूर भूंकपाच्यावेळी तेव्हाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना लातूरचा दौरा करायचा होता. मात्र मी त्यांना दहा दिवस न येण्याची विनंती केली. तुम्ही आलात तर सर्व यंत्रणा तुमच्यासाठी कामाला लागेल, असे सांगितले. माझे ऐकून नरसिंह राव दहा दिवसांनी दौऱ्यावर आले होते, अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज एका पत्रकार परिषदेत जागवली.
दौरे धीर देण्यासाठी असतात. जबाबदारी दिली आहे त्यांनी कामगिरी पूर्ण करण्यासाठी काम करावे. शासकीय यंत्रणा व स्थानिक पातळीवर लोक काम करत आहेत. त्यामुळे इतरांनी दौरे करु नयेत गर्दी करू नये. राज्यावर अशाप्रकारचे संकट आल्यानंतर मी दौऱ्यावर जात असतो. मात्र यावेळी मीदेखील दौऱ्यावर जाणे मुद्दाम टाळले आहे, असेही पवार यांनी सांगितले.

राज्यात एखादी आपत्ती आल्यानंतर त्या भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचे दौरे लोकांना धीर देण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी दौरे करुन लोकांना दिलासा देण्यासाठी लक्ष घालणे योग्य ठरते. आता स्थानिक प्रशासन, तेथील संघटना आणि कार्यकर्ते पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे इतर लोकांनी पूरग्रस्त भागात दौरे करुन ग्राऊंडवर काम करणाऱ्यांचे लक्ष विचलित होईल असे काम करू नये असे आवाहनही त्यांनी केले.
आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. पूरग्रस्तांना उभे करण्यासाठी केंद्राकडून अधिक मदत मिळवू शकतात. तसा ते प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे. मात्र इतर लोकांनी तिथे दौरे करणे टाळावेत असा सल्लाही शरद पवार यांनी दिला.
महापुरातील बेघरांना अडीच कोटींची मदत
या महापुरामुळे बेघर झालेल्या १६ हजार पीडितांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे २० हजार घरगुती भांडी आणि पांघरूण किटस असे अडीच कोटींचे साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही शरद पवार यांनी दिली.

