Homeमुंबई स्पेशल.. आणि अवघ्या...

.. आणि अवघ्या दीड मिनिटांतच राज्यपालांनी सोडले सभागृह!

विधानभवनात आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाच्या सत्ताधारी महाविकास आघाडी तसेच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे उद्विग्न झालेले राज्यपाल यांनी आपले अभिभाषण अवघ्या दीड-दोन मिनिटांतच अर्धवट सोडून संयुक्त बैठकीचे सभागृह सोडले.

आज विधानभवनात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. सकाळी ११ वाजता विधानसभा तसेच विधान परिषदेच्या संयुक्त बैठकीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरूवात झाली. राज्यपालांचे वाचन सुरू होताच सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेनंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी ईडीकडून दाऊदच्या हस्तकांशी व्यवहार करणाच्या आरोपांवरून अटक करण्यात आलेल्या अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली. यावेळी काही सदस्यांनी कुविख्यात दाऊद इब्राहिमची छायाचित्रेही झळकावली. दोन्ही बाजूंच्या सदस्यांची आक्रमक भूमिका पाहता राज्यपालांनी आपले अभिभाषण अर्धवट सोडत काही मिनिटांतच सभागृह सोडले.

राज्यपालांना माफी मागावीच लागेल – नाना पटोले

राज्यपाल निघून गेल्यावर सभागृहाबाहेर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्ही गदारोळ केलाच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यांना माफी मागावीच लागेल. आम्ही अभिभाषणाला विरोध केला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला, असे त्यांनी सांगितले.

राज्यपालांनीच राष्ट्रगीताचा अवमान केला – जयंत पाटील

राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रगीतानंतर अभिभाषणास सुरूवात केली. त्यानंतर ते काही मिनिटांतच अभिभाषण अर्धवट टाकून निघून गेले. अभिभाषणानंतर त्यांनी राष्ट्रगीत म्हणणे अभिप्रेत आहे. पण ते न म्हणता निघून जाणे हा राष्ट्रगीताचा अपमान आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केला.

कामकाज चालवणे हे सरकारचे काम – देवेंद्र फडणवीस

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, देशद्रोही दाऊद इब्राहीमची बहीण हसिना पारकर हिला व्यवहारातले पेसे देणारे आणि दाऊदच्या हस्तकांशी संबंध ठेवणारे मंत्री नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होईपर्यंत आम्ही संघर्ष करत राहणार. मुंबई उद्ध्वस्त करणाऱ्या दाऊदला अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांना पाठिशी घालत अभिभाषणाच्या माध्यमातून चुकीचे चित्र उभे करण्याविरूद्ध आम्ही घोषणाबाजी केली. अभिभाषणासह कामकाज सूरळीत चालवण्याची जबाबदारी सरकारची आहे, असेही त्यांनी सांगितले.

संजय दौंड यांचे शीर्षासन

यापाठोपाठ विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपाल हाय हाय.. खाली डोके वर पाय.. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांनी यावेळी शीर्षासन करून खाली डोके, वर पायचे प्रात्यक्षिक दाखवले.

विधानसभेत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी

विधानसभेतही कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नियम ५७ अन्वये बोलताना नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुंबईशी गद्दारी करणाऱ्या, बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊदच्या हस्तकांशी, नातेवाईकांशी व्यवहार करणाऱ्या, व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान देणे, इतकेच नव्हे त्या नवाब मलिक यांना अटक झाल्यावरही त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवणे घटनेला धरून नाही. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करावी, असे ते म्हणाले.

यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी हा विषय फेटाळला आणि राज्यपालांचे अभिभाषण पटलावर ठेवले. लगेच राज्यपालांचे अभिभाषणाबद्दल अभिनंदन करणारा प्रस्तावही मांडण्यात आला. त्यापाठोपाठ अध्यादेशही पटलावर ठेवण्यात आले. पुरवण्या मागण्याही सादर करण्यात आल्या.

तालीकाध्यक्ष जाहीर

गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करताना केलेले वक्तव्य कामकाजातून काढण्याची विनंती केली. परंतु उपाध्यक्ष झिरवाळ यांनी त्याकडे दुर्लक्ष करत तालिकाध्यक्षांची नावे जाहीर केली. भास्कर जाधव, कालीदास कोळंबकर, संजय शिरसाट, दीपक चव्हाण आणि कुणाल पाटील यांची तालीकाध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले. त्यानंतर लता मंगेशकर, राहुल बजाज, एन. डी. पाटील आदी सदस्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content