राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राजकीय पोकळीत, त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुरुवारी राज्यसभेचे खासदार म्हणून अधिकृतपणे शपथ घेतली. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात पार्थ पवारांच्या पेहरावापासून ते सभागृहातील वातावरणापर्यंत सर्वत्र अजितदादांच्या आठवणींचे सावट पाहायला मिळाले.
राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी संसद भवनात, महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित सदस्य पार्थ पवार यांना पदाची शपथ दिली. पवार यांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली. राज्यसभा नेते जगत प्रकाश नड्डा, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा सदस्य जयराम रमेश आणि प्रफुल्ल पटेल, लोकसभा सदस्य सुनील तटकरे, राज्यसभा महासचिव पी. सी. मोदी आणि सचिवालयाचे इतर वरिष्ठ अधिकारीही याप्रसंगी उपस्थित होते.
अजितदादांच्या लूकची चर्चा आणि गुलाबी जाकीट
शपथविधीसाठी पार्थ पवार यांनी पांढरा कुर्ता-पायजमा आणि त्यावर गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. डोळ्यांवर चष्मा आणि चेहऱ्यावरील हावभाव यामुळे सभागृहात अनेकांना अजितदादांच्या प्रतिमेची आठवण झाली. अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात गुलाबी जॅकेटला आपल्या पक्षाची एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. तोच वारसा पुढे नेत पार्थ पवारांनी आज संसदेत पाऊल ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यसभा सभापतींकडून जुन्या आठवणींना उजाळा
पार्थ पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी अत्यंत भावूक होत अजित पवार यांच्या कार्याचे स्मरण केले. “आज या सभागृहात एका तरुण नेतृldत्वाचे स्वागत करताना, मला त्यांचे वडील आणि महाराष्ट्राचे दिग्गज नेते अजित पवार यांची आठवण होत आहे. त्यांचा प्रशासकीय दरारा आणि कामाची पद्धत नेहमीच स्मरणात राहील,” अशा शब्दांत सभापतींनी आठवण व्यक्त केली. त्यावेळी सभागृहात काही काळ शांतता पसरली होती.
आई सुनेत्रा पवार यांची भावूक प्रतिक्रिया
या ऐतिहासिक प्रसंगी पार्थ पवारांच्या मातोश्री आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यादेखील उपस्थित होत्या. आपल्या मुलाचा शपथविधी पाहताना त्यांचे डोळे पाणावले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपली भावना व्यक्त करताना म्हटले की, “आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी अत्यंत भावूक आहे. साहेबांचे (अजितदादांचे) स्वप्न आणि त्यांचा वारसा पार्थ समर्थपणे पुढे नेईल, याची मला खात्री आहे.”
राजकीय पुनरागमन आणि पुढील वाटचाल
२०१९च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर होते. मात्र, वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. राज्यसभेच्या माध्यमातून आता ते दिल्लीच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज बुलंद करणार आहेत.

