मुंबई महापालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा दुसरा तलाव ‘विहार’, आज सकाळी ९ वाजता भरून वाहू लागला.
दोनच दिवसांपूर्वी मुंबईतच असलेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा तुळशी, हा कृत्रिम तलाव भरून वाहू लागला होता. विहार तलावही मुंबईत असलेला दुसरा तलाव आहे. हा तलावही कृत्रिम तलाव आहे. गेल्या वर्षी विहार तलाव ५ ऑगस्ट २०२० रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला होता. तुळशी तलावाआधी पवई, हा कृत्रिम तलावही भरून वाहू लागला आहे. मात्र, या तलावातले पाणी पिण्यासाठी योग्य नसल्यामुळे ते औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते.
२७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष २०१९मध्ये ३१ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्याआधीच्या वर्षी म्हणजेच २०१८मध्ये १६ जुलैला विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.
मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव सर्वात लहान दोन तलावांपैकी एक असून यापैकी तुळशी तलाव सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
विहार तलावाबाबत महत्त्वाची माहिती
मुंबई महापालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. या तलावाचे बांधकाम सन १८५९मध्ये पूर्ण झाले. त्याच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये खर्च आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र जवळजवळ सुमारे १८.९६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा २७,६९८ दशलक्ष लीटर असतो. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते.