राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक तथाकथित अश्लिल पोस्ट वायरल करण्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ताबडतोब अटक करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी विधानसभेत केली.
काँग्रेसचे नाना पटोले यांनी या पोस्टचा उल्लेख करत सत्य काय हे स्पष्ट व्हावे अशी मागणी केली होती. फडणवीस यांनी लगेचच हा मुद्दा घेत सरकारवर हल्ला चढवला. या सरकारच्या काळात काय चालले आहे हेच कळत नाही. प्रश्न माझ्या बदनामीचा नाही. मला लोक ओळखतात. परंतु अशी विकृती वेळीच आवरली गेली पाहिजे, असे ते म्हणाले. ही व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ता असून तो पुण्यातला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावर लगेचच हस्तक्षेप करत अजित पवार यांनी आरोपीला आजच्या आज अटक केली जाईल, असे आश्वासन दिले. हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असो किंवा आणखी कोणी, अशी प्रवृत्ती अजिबात सहन केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
जय श्री रामच्या घोषणांनी विधानसभा दुमदुमली
अयोध्येतील श्री रामाच्या मंदिरासाठी पैसे गोळा करणारे हे लोक कोण? त्यांना कोणी अधिकार दिले? त्यांना सरकारने लायसंस दिले आहे का, असे सवाल करत काँग्रेसचे सदस्य नाना पटोले यांनी काल विधानसभेत भारतीय जनता पार्टीवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न करताच भाजपाच्या सदस्यांनी जय श्री रामच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.
विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीबद्दल सुधीर मुनगंटीवार बोलल्यानंतर लगेचच पटोले यांनी हा विषय उपस्थित केला. आपल्याकडे काही लोक निधी गोळा करण्यासाठी आले होते. आपण त्यांना माघारी पाठवल्यानंतर त्यांनी आपल्याला धमकी दिली, असे ते म्हणाले. त्यानंतर हे लोक कोण वगैरे भाष्य करतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस संतप्त झाले. खंडणीखोरांना समर्पण निधी काय असतो हे कळणार, असा सवाल त्यांनी केला. या विषयावर स्वतंत्र चर्चा ठेवावी. सरकारची हिम्मत आहे का, असे आव्हानही त्यांनी दिले. त्यावेळी विरोधी पक्षांचे सदस्य जय श्री रामच्या घोषणा देऊ लागले. वातावरण तापल्याचे लक्षात येताच उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.
अबू आझमींची मुख्यमंत्र्यांविरूद्ध नाराजी
वादग्रस्त बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्याप्रकरणी आनंद व्यक्त केल्याबद्दल समाजवादी पार्टीचे सदस्य अबू आझमी यांनी विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरूद्ध तीव्र नापसंती व्यक्त केली.
राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी बाबरी पडल्याबद्दल आनंद झाल्याचे म्हटले होते. त्याला आक्षेप घेत आझमी म्हणाले की, धर्मनिरपेक्ष ताकदीवर सरकार चालवले जात असताना मुख्यमंत्र्यांनी असे विधान करून आमच्या जखमेची खपली काढू नये. त्यावर शिवसेनेच्या काही सदस्यांनी आक्षेप नोंदविण्याचा प्रयत्न केला. परंतु उपाध्यक्ष झिरवळ यांनी पुढच्या वक्त्याचे नाव पुकारल्याने हा विषय तेथेच संपला.