सुनील तटकरे यांची ती भाषणे विधिमंडळाच्या दस्ताऐवजातून इतिहासाचा एक भाग झालेले आहेत. त्यांच्या भाषणातून भावी पिढ्यांना त्याचा अभ्यास करता येणार आहे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुनील तटकरे यांच्या कार्याचे कौतुक केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांच्या ‘अभिनंदन… अभिवादन’ या पुस्तकाचे प्रकाशन आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडले. त्यावेळी अजित पवार बोलत होते.
तटकरे कोकणातील आहेत. कोकणातील लोकांना गोष्टी ऐकायला आणि सांगायला फार आवडतात. कोकणी माणसांचा गोष्टी वेल्हाळपणा तटकरे यांनी पुरेपूर उचलला आहे. विधिमंडळ किंवा विधिमंडळाच्या बाहेरची भाषणे ऐकल्यावर त्यांच्या ज्ञानाची, गुणांची, नेतृत्त्व, कर्तृत्त्व आणि वक्तृत्त्व याची सगळ्यांना खात्री पटते. साहेबांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विधिमंडळातील भाषण ऐकले तर माझ्यासारख्या अनेकांच्या लक्षात आले की, त्यांच्या हातामध्ये कागदाची एक चिठ्ठी न घेता तासभर ओघवते भाषण करण्याची त्यांची शैली आहे. पवारसाहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी सांगितले ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले असेही अजित पवार म्हणाले.
लोकसभेचे खासदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या व आमदारपदाच्या काळात विधिमंडळात केलेल्या निवडक व अतिशय भावस्पर्शी भाषणांचे संकलन ‘अभिनंदन… अभिवादन’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन असल्याने ते उपस्थित राहू शकले शकले नाहीत. १३ महिने तुरूंगात राहून जामिनावर सुटलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुखही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

त्याग, अनुभव आणि वक्तृत्त्वशैली आहे म्हणून भाषणे चांगली होतात असे नाही तर आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याबद्दल विचार मांडणार आहोत, ज्यांच्यासाठी त्यांच्याबद्दल आपल्या मनात निष्ठा, कणव, कळवळा असला पाहिजे तरच भाषणे भावस्पर्शी होतात असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशी म्हण आहे त्याप्रमाणे त्यांना लोकांची कामे करण्याची खोड लागली आहे. ते दिल्लीत असले तरी त्यांचे बारीक लक्ष रायगड जिल्ह्यातील गाव तालुका इथे असते. सुनील तटकरे यांना एकदा अपयश मिळाले तरी खचून न जाता ते पुढे जात राहिले आणि ते मंत्री, पक्षाचे प्रमुख नेते आहेत. आता दिल्लीत खासदार म्हणून चांगल्या कामाचा ठसा उमटवत आहेत, असेही ते म्हणाले.
खेड्यात जन्मलेल्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याचे विधीमंडळातील भाषणाचे पुस्तकाचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होतेय यासारखे कुठले भाग्य असू शकत नाही असे खासदार सुनील तटकरे म्हणाले.
माणसाला वेगवेगळ्या पद्धतीची कामे करण्याची संधी मिळत असते. परंतु संधी मिळत असताना त्याच्या मागचा मागोवा घेणे त्यापाठीमागचे सिंहावलोकन करणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असते. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकायला मिळाले, इंग्रजी शिक्षण घेता आले नाही. पण तरीसुद्धा राजकारणाची आणि कामांची ओढ वडिलांमुळे लागली. त्या काळात एका उत्तुंग नेतृत्त्वाचा सहवास मिळाला ते म्हणजे बॅ. अंतुले यांचा. वयाच्या तेराव्या वर्षी अंतुलेंना कोलाडच्या नाक्यावर पाहिले हा किस्साही सुनील तटकरे यांनी आवर्जून सांगितला.
अनिल देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेट
कार्यक्रमानंतर अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तुरूंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची शरद पवारांशी भेट झाली. या भेटीचा तपशील जाहीर करण्यात आला नाही. मात्र, या दोघांमध्ये त्यांच्या प्रकरणात पुढच्या व्यूहरचनेवर चर्चा झाली असावी, असा कयास बांधला जात आहे.

