Details
विनय गजानन खरे..
ज्येष्ठ पत्रकार
“प्लॅस्टिकच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आता सरसावले असले तरी १४ देशांनी यापूर्वीच सिंगल युज प्लॅस्टिकला बंदी घातली आहे. गेल्या २ ऑक्टोबरपासून ती लागू झाली. सर्व जग या प्रश्नाने बेजार झाले आहे. मात्र, लोकजीवनात मोलाचे स्थान मिळवणाऱ्या प्लॅस्टिकपासून “”मुक्ती”” यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. सामुहिक प्रयत्नांची जोड देणे आवश्यक आहे. साधारणतः १९५०पासून याचा वापर सुरू झाला. गेल्या ७० वर्षांत ८.३ अरब मेट्रिक टनपेक्षा जास्त प्लॅस्टिकचे उत्पादन जगात झाले तर दरवर्षी आठ मिलियन टन समुद्रात टाकले जाते असा अंदाज आहे.”
“पिण्याच्या पाण्यात, आपल्या जेवणात, रोजच्या श्वासात प्लॅस्टिकची मात्रा आली आहे. ज्या पद्धतीने याची वाढ होतेय ते भयानक आहे. हे रोखलं नाही तर नियंत्रण ठेवणे अशक्य होईल. यासाठीच एकदा वापरण्याच्या प्लॅस्टिकवर १४ देशांनी बंदी आणली ते पुढीलप्रमाणे: इंटिगुआ बार्बुडा, चीन, कोलंबिया, सामोआ, झिम्बम्बावे, बांगला देश, कॅमेरून, ट्युनिशिया, रोमानिया, अल्बनिया, जॉर्जिया, सेनेगल, रवंडा, द कोरिया. सिंगल युज प्लॅस्टिकवर बंदी आणणारा बांगला देश पहिला देश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा देश जे करू शकतो त्याचे अनुसरण अन्य करू शकतात असे म्हटले आहे.”
मेघालयने स्वीकारले आव्हान!
आगामी २०२२पर्यंत राज्य प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी मेघालय सरकार सरसावले असून त्यांनी येथील दालमिया सिमेंटशी करार केला आहे. त्यात पूर्वेकडील टॉपकेम सिमेंट कंपनी सहभागी होणार असून कोळशाऐवजी प्लॅस्टिक इंधन म्हणून वापरले जाणार आहे. हा निर्णय राबवताना पर्यावरण हानी होणार नाही याची ग्वाही कंपनीने दिली आहे. मुख्यमंत्री कोनरड संगमा यांनी गांधीजयंती दिनी हा करार करताना हे भाष्य केलंय. यावर राज्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष ठेवेल. स्वच्छ भारत मोहिमेतून राज्यभरातून १७ टन प्लॅस्टिक जमा झाले असून या कंपन्या त्यासाठी ३० रूपये किलोचा भाव देणार आहेत.
१६५०किलोच्या चरख्याचे अनावरण!
येथील महामाया उड्डाणपुलाजवळ १४ × २० × ८ फूट आकाराच्या निरूपयोगी प्लॅस्टिकपासून बनविलेल्या चरख्याचे म. गांधींच्या १५०व्या जयंतीदिनी अनावरण करण्यात आले. स्वयंपूर्णता नि स्वावलंबी या स्वदेशी सूत्राचा अवलंब करावा असे गांधीजींचे मत होते. यासाठी सुमारे १२५० किलो प्लॅस्टिकचा वापर करण्यात आला असे नोएडा प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रितू माहेश्वरी यांनी सांगितले. यातून लोकांमध्ये प्लास्टिकच्या योग्य विल्हेवाटीची जाणीव व्हावी हा उद्द्येश असल्याचे त्या म्हणाल्या. एकदा वापरण्याच्या प्लॅस्टिकविरोधात पंतप्रधान मोदींनी मोहीम सुरू केली असल्याने ती ११ ऑक्टोबरपर्यंत आम्ही राबविली असे त्यांनी सांगितले.
सिंगल युज प्लॅस्टिक म्हणजे काय?
सिंगल युज प्लॅस्टिक म्हणजे एकदा वापरून जे फेकून दिले जाते ते! ही सोपी सुटसुटीत व्याख्या आहे त्याची! यात आपल्या दैनंदिन वापराच्या अनेक बाबी येतात अन लोकांना त्या कोणत्या हे कळत नाही म्हणे! सरकारने पर्यावरण संरक्षणासाठी यावर बंदी आणली आहे. त्याची ओळख सोपी आहे जे ४० मायक्रोनच्या खाली कमी जाडीचे नि पातळ असेल ते. ज्याचा पुनर्वापर शक्य नसतो पण जगात राहिले तर नाशही पावत नाही. त्याचा धोका सर्व प्राणिमात्रास होतो.
“यात कोणते प्लॅस्टिक येते ते पाहू यादी बरीच मोठी आहे. दुकानदार, भाजीवाल्याकडील पातळ पिशव्या, कोला चहाचे पातळ ग्लास, पाण्याच्या बाटल्या, पाणी, शीतपेय बाटल्या, स्ट्रॉ, पाणीपुरी ताटल्या, जेवण ताट, केक कापण्याची सुरी, त्यातील काटे चमचे, थर्माकोल सामान, ऑनलाईन शॉपिंगने येणारे प्लॅस्टिक आदी! तेव्हा हे वापरू नका. परिसर स्वच्छतेला मदत करा.”
इंडियन ऑइलने केला प्लॅस्टिक रस्ता!
नागोठणे येथील रिलायन्स कंपनीने ४० किमीचा रस्ता सिंगल युज प्लॅस्टिकने बनवल्याची बातमी असतांना इंडियन ऑइल फरीदाबादनेही येथील संशोधन नि विकास केंद्राचा ८५० मीटर लांबीचा रस्ता प्लॅस्टिक नि बिटूमनच्या सहाय्याने तयार केला.
“महाराष्ट्रातील नागोठणेत पॉलिथीन प्लॅस्टिकसह हा रस्ता कंपनीच्या अंतर्गत नि बाह्य भागात तयार केला. तर आय ओ ने आपल्या संशोधन केंद्र इमारतीच्या परिसरात असा रस्ता बनवत यामुळे चांगली मजबुती मिळत असल्याचे सांगत टिकाऊपणा, पाणी न साचणे, खड्डे कमी पडणे आदी फायदे नमूद केले आहेत. मात्र, पुनर्वापरासाठी प्लॅस्टिक उपयोगात आणायचे झाल्यास त्याला धुण्यास खूप पाणी लागते असेही सांगितले.”
समुद्री शास्त्रज्ञांनी तळाशी असलेल्या लहान जीवांच्या पोटात प्लॅस्टिकचे कण आढळल्याचे सांगून भयानकता दाखवली आहे. इतकेच नव्हे तर अगदी दूरच्या अंटार्क्टिका भागात प्लॅस्टिक सापडले आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याच्या एका गावातील गाईच्या पोटातून ५२ किलो प्लॅस्टिक सापडले अशी बातमी होती. आता बोला! याची गंभीरता वेळीच ओळखली पाहिजे अन्यथा..

