मीरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच पूर्वपदावर येईल आणि पुन्हा जुने दिवस परत येतील. राष्ट्रवादीला इथे स्कोप आहे असे अनेक सर्व्हे सांगतात. आपल्या सर्वांचा एकच नेता आहे, ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब… तुम्हाला फक्त पवारसाहेबांसाठी काम करायचे हे लक्षात ठेवा आणि कामाला लागा.. अशी साद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घातली.
मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. आपला नेता सर्वात जास्त अनुभवी आहे. अगदी विरोधकांना विचारले तरी ते सांगतील, पवारसाहेब मोठे नेते आहेत. मागचा कालखंड पाहिला तर अनेकजण आज पवारसाहेबांच्या विचारांनी प्रभावित होत राष्ट्रवादीमध्ये काम करू इच्छितात. त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढवा, असे आवाहनही त्यांनी केले.
मतमोजणीची तारीख डोक्यात ठेवून लोकांच्या छोट्यामोठ्या कामांची पूर्तता करा. आरोग्याशी संबंधित कामे… त्यांच्या रेशनकार्डची कामे… वॉटर मीटर, गटाराच्या प्रश्नांची सोडवणूक करा असे मार्गदर्शनही त्यांनी केले.

१९९९ला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाने सर्वत्र आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. तीच घोडदौड मीरा-भाईंदरमध्येही कायम ठेवली म्हणून सुरुवातीचा बराच काळ इथे राष्ट्रवादीची सत्ता होती. मधल्या काळात इथे सत्तांतर झाले. पण आपल्याला येत्या काळात ही परिस्थिती बदलायची आहे, असे आवाहन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले.
स्थानिक नेत्यांच्या भ्रष्टाचाराला लोकं कंटाळली आहे. लोकांना इथे बदल हवा आहे. येणार्या काळात बऱ्याच गोष्टी घडतील. फक्त आपली एकजूट आपल्याला कायम ठेवायची आहे. मला खात्री आहे, आपण इथे राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी महापौर निर्मला साबळे, हिंदीभाषिक सेल अध्यक्षा मनीषा दुबे, राज्य सचिव संतोष पेंडूलकर आदी उपस्थित होते.

