कॅलेंडरवर नजर टाका. २५ मार्च नुकताच संपला. अनेक राष्ट्रीय अन् जागतिक दिवसांच्या गर्दीत एक दिवस लपलेला असतो, जो भारतात जवळजवळ कुणाला माहीतच नाही. इंटरनॅशनल डे ऑफ दी अनबोर्न चाईल्ड अर्थात जागतिक अजन्मा बालक दिन. ज्या बाळाने कधी पहिला श्वास घेतला नाही, ज्याने डोळे उघडले नाहीत, ज्याने आई म्हणून हाक मारली नाही- त्याच्यासाठी एक आंतरराष्ट्रीय दिवस? हे ऐकताना विचित्र वाटेल. पण या दिवसाच्या मागे एक विलक्षण इतिहास आहे आणि भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.
१३ नोव्हेंबर १९९८. व्हॅटिकनमध्ये एक खास भेट झाली. अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेम पोप जॉन पॉल द्वितीय यांना भेटले. या खासगी भेटीत मेनेम यांनी एक असामान्य प्रस्ताव मांडला- अजन्मा बालकांसाठी एक विशेष दिवस जाहीर करण्याचा. त्यानंतर अवघ्या महिनाभरात, ८ डिसेंबर १९९८ रोजी इमॅक्युलेट कन्सेप्शनच्या पर्वावर मेनेम यांनी एका डीक्रीवर स्वाक्षरी केली आणि २५ मार्च हा “डे ऑफ दी अनबोर्न चाईल्ड” म्हणून अधिकृतपणे घोषित झाला. पहिला उत्सव १९९९मध्ये साजरा करण्यात आला.
तारीख का २५ मार्च? कारण हा दिवस ख्रिसमसच्या (२५ डिसेंबर) बरोबर नऊ महिने आधी येतो, ज्या दिवशी मदर मेरीला येशूच्या जन्माची घोषणा झाली, त्या “फीस्ट ऑफ द अनन्सिअेशन”शी हा दिवस जोडलेला आहे. धर्मशास्त्रीय प्रतीकवाद स्पष्ट आहे: जीवन जन्माने नाही, गर्भधारणेने सुरू होते. पोप जॉन पॉल द्वितीय यांनी हा दिवस “जीवनाच्या संस्कृतीच्या प्रसारासाठी एक सकारात्मक पाऊल” असे म्हटले होते.
एका देशातून जगभर
१९९३मध्ये एल साल्वाडोर हा “जन्माच्या अधिकाराचा दिवस” अधिकृतपणे साजरा करणारा पहिला देश ठरला. त्यानंतर अर्जेंटिना (१९९८), चिली, ग्वाटेमाला, कोस्टा रिका, निकाराग्वा, डॉमिनिकन रिपब्लिक, पेरू, पराग्वे, फिलिपिन्स, होंडुरास, इक्वेडोर आणि पोर्तो रिको या देशांनी हा दिवस अधिकृतपणे स्वीकारला. हा दिवस केवळ कॅथलिक देशांपुरता मर्यादित नाही. कोणतीही धार्मिक अथवा बिनधार्मिक प्रो-लाइफ संस्था या दिवशी सहभागी होऊ शकते. स्पेनमध्ये यानिमित्त २००हून अधिक नागरी संस्था रस्त्यावर उतरल्याच्या नोंदी आहेत.
भारतात हा दिवस का परिचित नाही?
भारत हा विषय ऐकून थेट दोन टोकांवर विभागतो. एक वर्ग म्हणतो, “हा पश्चिमी धार्मिक अजेंडा आहे.” दुसरा वर्ग म्हणतो, “महिलेच्या शरीरावर तिचाच अधिकार आहे.” या दोन्ही बाजूंचा आवाज इतका मोठा आहे की, मध्यभागी असलेला एक मूलभूत प्रश्न बुडून जातो- गर्भातील जीवाला आपण कोण समजतो? भारतीय कायद्याचे उत्तर स्पष्ट आहे. एमटीपी कायदा गर्भाला (फीट्स) कोणताही स्वतंत्र अधिकार देत नाही. गर्भधारणा संपवण्यावरील कालमर्यादा ही गर्भाच्या अधिकारासाठी नाही, तर आईच्या आरोग्याच्या जोखमीमुळे आखली आहे. पण भारताला या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही, कारण आपल्याकडे एक वेगळीच शोकांतिका आहे.

भारताची वेदना: मुलगी म्हणून जन्मणेच गुन्हा?
जगभरात “अजन्मा बालक दिन” हा प्रामुख्याने गर्भपाताच्या विरोधात साजरा केला जातो. भारतात मात्र या प्रश्नाला एक वेगळे, भयावह परिमाण आहे- लिंग-निवडक गर्भपात. प्यू रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार, २०००-२०१९ या काळात भारतात किमान ९० लाख मुलींचे गर्भपात झाले. हा आकडा वाचताना हात थरथरतो. हे नऊ लाख नाही, नव्वद लाख आहे. पॉप्युलेशन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मते, २०००-२०१४ या केवळ चौदा वर्षांत भारतात १ कोटी २७ लाखांहून अधिक लिंग-निवडक गर्भपात झाले- म्हणजे दररोज सरासरी २,३३२! भारतातील ०-६ वयोगटातील मुलींची लोकसंख्या २००१मध्ये ७ कोटी ८८ लाख होती, ती २०११मध्ये ७ कोटी ५८ लाखांवर घसरली. या आकड्यांमागे जे जीव विझले, ते “अजन्मे” होते- पण त्यांना निवडून संपवले गेले.
कायदा काय सांगतो?
भारतात २०२१च्या एमटीपी सुधारित कायद्याने गर्भपाताची मर्यादा २०वरून २४ आठवड्यांपर्यंत वाढवली. हे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रगतिशील पाऊल आहे. त्याचबरोबर, हिंदू सक्सेशन कायद्याच्या सेक्शन २० अन्वये अजन्मा बालकाला कौटुंबिक संपत्तीत कायदेशीर हक्क मिळतो. ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी कायद्याच्या सेक्शन १३नुसार एखाद्या व्यक्तीला अजन्मा बालकाच्या नावे संपत्ती हस्तांतरित करता येते. थोडक्यात, भारतीय कायद्यात अजन्मा बालकाला वारसाहक्क आहे, पण जगण्याचा हक्क नाही- ही विरोधाभासाची खटकणारी बाब आहे.
हा दिवस केवळ धार्मिक नाही
हे वाचताना अनेकांना वाटेल- हा तर पाश्चात्य कॅथलिक अजेंडा आहे, भारताशी काय संबंध? पण, एक क्षण थांबा. जेव्हा मदर तेरेसा म्हणाल्या, “मानवाधिकार हे सरकारने दिलेली सवलत नाही, ते प्रत्येक माणसाचे जन्मजात आणि कदाचित गर्भातूनच मिळालेले हक्क आहेत”- तेव्हा त्या पाश्चात्य नव्हत्या, त्या कोलकात्याच्या होत्या. भारतीय तत्त्वज्ञानात गर्भ हे जीव मानण्याची परंपरा खूप जुनी आहे. गर्भसंस्कार, गर्भावस्थेतील संगीत, गीतेतील “अजन्मा आत्मा”- हे सारे गर्भातील जीवाला जाणीवपूर्वक स्थान देतात.
प्रश्न साधा आहे, उत्तर कठीण
“जीवन कधी सुरू होते?”- हा जगातील सर्वाधिक वादग्रस्त प्रश्न आहे. गर्भधारणेच्या क्षणापासून जीवन सुरू होते असे मानणाऱ्यांचा युक्तिवाद तितकाच ठोस आहे, जितका जन्मानंतरच जीवन सुरू होते असे मानणाऱ्यांचा. २५ मार्च हा दिवस या प्रश्नाचे उत्तर देण्याचा दावा करत नाही. तो केवळ एक आठवण करून देतो की, या प्रश्नावर विचार करण्याची सवड आपण समाज म्हणून घेतली पाहिजे.
भारतात जिथे दरवर्षी लाखो मुली केवळ मुलगी म्हणून जन्माला येण्याआधीच संपवल्या जातात, तिथे “अजन्मा बालक दिन” हा परका विषय नाही. तो आपल्याच घरातील अनुत्तरित प्रश्न आहे. दरवर्षी २५ मार्च उजाडेल. कॅलेंडरवर तो दिवस नेहमीसारखाच असेल. पण त्या दिवशी एकदा विचार करा- जे कधी जन्मलेच नाहीत, त्यांची आठवण ठेवणे हे माणुसकीचे लक्षण आहे की, भावनाशीलता? हा प्रश्न तुम्हालाच स्वतःला विचारायचा आहे.
(लेखक डॉ. निवेदिता अजय पाटील शोभना हॉस्पिटल, २५, सुपारी बाग, जामनेर, जळगाव)

