Homeडेली पल्सकाँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवून मेट्रो कार्पोरेशने ही जागा परस्पर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला विकली आहे. हा व्यवहार रद्द करून नरीमन पाईंट येथील पूर्वीच्याच जागी काँग्रेसला कार्यालय बांधून द्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.

मुंबईत टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, मंत्रालयासमोर नरीमन पाईंट येथे काँग्रेस पक्षाचे गांधी भवन हे कार्यालय तसेच राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांची कार्यालये अनेक वर्षांपासून होती. मुंबई मेट्रो टप्पा-३चे काम पूर्ण झाल्यानंतर फ्री प्रेस जर्नल मार्गावरील त्याच जागेत नव्याने कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करून राजकीय पक्षांना MMRDA आणि MMRC यांनी कार्यालये देण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी असा शासन आदेश २१ ऑक्टोबर २०१५ रोजी काढण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मेट्रोच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरुपात कार्यालय हस्तांतरीत करावे असे पत्र २ डिसेंबर २०१६ रोजी काँग्रेसला दिले होते. आता मात्र मेट्रो कार्पोरेशन व सरकारने त्यांनी दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे. काँग्रेसशी कोणतीही चर्चा न करता ही जागा परस्पर रिझर्व्ह बँकेला ३४०० कोटी रुपयांना विकण्यात आली आहे. ५ सप्टेंबरला या व्यवहाराचे रजिस्ट्रेशनही करण्यात आले आहे.

काँग्रेस पक्षासह सर्व राजकीय पक्षांना कार्यालये बांधून देणार असल्याच्या आश्वासनाची माहिती मेट्रो कार्पोरेशनने रिझर्व्ह बँकेला न देऊन त्यांचीही फसवणूक केली आहे. जमीन अधिग्रहण प्रकरणात सरकार जर राजकीय पक्षांची अशी फसवणूक करत असेल तर सामान्य माणसाच्या जमीन अधिग्रहणात किती फसवणूक करत असेल म्हणून जनतेचा अशा प्रकरणाच्या जमीन अधिग्रहणावर विश्वास राहिलेला नाही. नरीमन पाईंट येथील या जागेचे बाजारमूल्य ५२०० कोटी रुपये आहे. पण ३४०० कोटी रुपयांचा व्यवहार करून १८०० कोटी रुपयांचे नुकसानही झाले आहे. हा व्यवहार अहंकारी, मनमानी तसेच गुन्हेगारी स्वरुपाचा असून तो तत्काळ रद्द करावा अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.

प्रदेश उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनीही या संपूर्ण व्यवहाराची माहिती दिली व त्यासंदर्भातील पत्रव्यवहारही दाखवला. काँग्रेसला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नरीमन पाईंट तेथील पूर्वीच्या जागीच काँग्रेस पक्षाला कार्यालय द्यावे अन्यथा न्यायालयात धाव घेऊ असा इशाराही त्यांनी दिला. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष रमेश शेट्टी आदी उपस्थित होते.

Continue reading

हरमित सिंग ठरला ‘खासदार श्री’चा किंग!

मुंबईच्या शरीरसौष्ठवाची अस्सल श्रीमंती दाखवणारी ३००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगलेली जोरदार चुरस... मुंबईच्या फिटनेस संस्कृतीचा क्रीडासोहळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेली लाख मोलाच्या बक्षिसांची उधळण, यामुळे ‘खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धे’ने...

क्रिकेट विश्वचषक जिंकलाः प्रतिका, स्नेह, रेणुकाला रेल्वेकडून बढती!

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या नामवंत महिला क्रिकेटपटूंना, विशेष बाब म्हणून (Out-of-Turn Promotion) पदोन्नती देण्यात आली...

मुंबईत जल मेट्रो प्रकल्प राबवा!

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विकास होत असल्याने त्या-त्या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने येथील अंतर्गत रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी...
Skip to content