Thursday, March 13, 2025
Homeपब्लिक फिगरनवी पिढी हिंदी,...

नवी पिढी हिंदी, मराठी लिहू-वाचू शकत नाही ही चिंतेची बाब!

भाषा व साहित्य विभिन्न संस्कृती व दृष्टिकोन समजण्यास मदत करतात, तसेच विचारशीलता, ज्ञान व स्नेहभाव वृद्धिंगत करतात. मात्र आज वाचनसंस्कृती लोप पावत आहे. दिवसेंदिवस नवी पिढी मराठी, हिंदी व इतर प्रादेशिक भाषा लिहिण्यास व वाचण्यास असमर्थ होत आहे, ही चिंतेची बाब आहे. हे चित्र बदलून आपल्या भाषांप्रती नव्या पिढीमध्ये अभिमान जगविण्यासाठी घरोघरी मातृभाषेतच बोलले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी काल केले.

साहित्य, संस्कृती, शिक्षण, कला व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील ४८ व्यक्तींना गुरुवारी राज्यपाल बैस यांच्या हस्ते ‘वाग्धारा नवरत्न’, ‘स्वयंसिद्ध’, ‘यंग अचिव्हर्स’ व जीवन गौरव सन्मान मुक्ती सभागृह, अंधेरी, मुंबई येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

इंग्रजी भाषा अवश्य शिकली पाहिजे. त्याही पलीकडे जर्मन, फ्रेंच, मँडरिन या भाषादेखील शिकाव्या. परंतु मातृभाषेची उपेक्षा करुन विकसित भारताचे लक्ष गाठता येणार नाही असे राज्यपालांनी सांगितले.

आज घरात चार व्यक्ती असतील तर चारही जण मोबाईलवर हरवलेले असतात. त्यामुळे संवाद हरवत चालला. केवळ मुलेच नाही तर आईवडीलदेखील मोबाईलवर अधिक वेळ घालवतात. व्हॉट्सअप हेच जणू विद्यापीठ बनले आहे. चांगली व्यक्ती होण्यासाठी उत्तम वाचनाला पर्याय नाही, यास्तव वाचनसंस्कृतीला चालना द्यावी लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक नंदलाल पाठक यांना ‘वाग्धारा जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्तीसगड येथील प्रसिद्ध पांडवाणी गायिका रितू वर्मा तसेच तर ज्येष्ठ पत्रकार राजेश बादल यांना ‘वाग्धारा नवरत्न’ सन्मान देण्यात आला. पत्रकार व संपादक नरेंद्र कोठेकर, अभिनेत्री सीमा बिस्वास यांसह इतरांना ‘वाग्धारा’ स्वयंसिद्ध पुरस्कार देण्यात आला. यावेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष जयंत देशमुख,  ‘वाग्धारा’चे अध्यक्ष डॉ. वागीश सारस्वत, कार्यकारी अध्यक्ष दुर्गेश्वरी सिंह ‘महक’, ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक विमल मिश्र आदी उपस्थित होते.

सुदर्शन द्विवेदी, संगीता वाघे, मंगला वाघे, डॉ. मुस्तफा युसूफ अली गोम, इकबाल ममदानी, वीरेंद्र सक्सेना, डॉ. राजीव मिश्रा, डॉ. जीवन संखे यांनादेखील यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.    

Continue reading

‘शातिर..’मधून अभिनेत्री रेश्मा वायकर करणार पदार्पण

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिलाप्रधान चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते. मात्र मराठीत महिलाप्रधान सस्पेन्स थ्रिलर प्रकारातील चित्रपटांचा अभाव आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने ‘शातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या...

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...
Skip to content