मुंबईतल्या मरीन ड्राइव्हवरील शासकीय वसतिगृहात १८ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्त्या झालेल्या घटनेपासून धडा घेत राज्यातल्या सर्व वसतीगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या नियमांची, कायद्यांची युध्दपातळीवर अंमलबजावणी करावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॅा. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
मरीन ड्राईव्हवरील पोलीस जिमखान्याजवळ असलेल्या सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात एका 18 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्त्या करण्यात आली. पीडित तरुणी अकोल्याची असून शहरातील महाविद्यालयात शिकत होती. ती एका कंपनीत अर्धवेळ काम करत होती. ही घटना दि. ६ जून २०२३ रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. कथित गुन्हेगार ओमप्रकाश कनोजिया या ३३ वर्षीय सुरक्षारक्षकाने नंतर मरीन लाईन्स स्टेशन आणि चर्चगेट दरम्यानच्या रेल्वे रुळांवर स्वतःचा जीव दिला. विवाहित आणि कुलाब्यात राहणारा कनोजिया हा या भीषण गुन्ह्यात प्रमुख संशयित होता.
या संदर्भात उपसभापती डॅा. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, पोलीस महासंचालक आदींना एक पत्र पाठवून वसतीगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या नियमांची, कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
९० दिवसांचा कालावधी गृहित धरुन ही नियमावली तयार करण्यात यावी. यामध्ये शहरी भाग, छोटी शहर, ग्रामीण भाग, या परिसरातील शैक्षणिक संस्थांचा अभ्यास करुन सर्वसमावेशक अशी नियमावली तयार करावी. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल ॲप तयार करावे. विद्यार्थिनींच्या तक्रारींनंतर त्यांना तत्काळ प्रतिसाद देऊन सहानुभूतीपूर्वक न्याय दिला पाहिजे. अनेकवेळा महिला तक्रारीसाठी धाडसाने पुढे येत नाही. यासाठी संवाद समितीसुद्धा गठीत करावी. या समितीमध्ये प्राध्यापक महिला, प्रशासकीय महिला, स्थानिक पोलीस प्रशासनातील प्रतिनिधी, सायबर संबंधातील प्रतिनिधी अशी सर्वसमावेश समिती असावी. प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अशा सर्व वसतिगृहांना त्या-त्या पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक १५ दिवसांतून एकदा भेट देऊन तेथील प्रवेशितासोबत संवाद साधावा. याबाबतच्या भेटीचा अहवाल राज्यस्तरावर संकलित करण्यात यावा, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
या प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे? ह्या घटनेचा छडा लागू नये पुरावा नष्ट करण्याचा प्रकार झालाय का, याबाबत पोलिसांनी अधिक तपास करावा तसेच आरोपींवर आवश्यक कलमे लावून त्वरीत पुढील कारवाई करावी व लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावे. या घटनेतील आरोपीस मदत करणारे त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करावी. पीडितेच्या कुटुंबाचे मानसिक समुपदेशन करण्यात यावे तसेच पिडीत कुटुंबाला मनोधेर्य योजनेतून तत्काळ मदत करण्यात यावी, अशी मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

