Homeपब्लिक फिगरअचानक उष्मा वाढल्याने...

अचानक उष्मा वाढल्याने श्रीसेवकांचा मृत्यू!

नवी मुंबईतल्या खारघर येथील महाराष्ट्र भूषण देण्याच्या कार्यक्रमाची वेळ सर्वांच्या सोयीसाठी सकाळची ठरवण्यात आली होती. मात्र दोन दिवसात अचानक उष्मा वाढला आणि परिणामी उष्माघातामुळे 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली होती. रुग्णवाहिका तैनात होत्या. पाण्याचे टँकरची सोय होती. नळ बसवण्यात आले होते. वैद्यकीय पथके तयार ठेवण्यात आली होती. हा कार्यक्रम संध्याकाळी घ्यावा असे आमचे मत होते. परंतु कार्यक्रम संपल्यानंतर श्रीसेवकांची जाण्याची गैरसोय होईल म्हणून हा कार्यक्रम सकाळच्या वेळेत घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे सत्कारमूर्ती डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याशी चर्चा केली. लोकांच्या सोयीसाठी तसेच इतर मान्यवरांच्या दृष्टिकोनातून सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले, असे त्यांनी सांगितले.

आपण स्वतः पाच दिवस तेथे होतो. ठाण्याचे, पालघरचे पालकमंत्री तेथे लक्ष ठेवून होते. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा स्वतः तिथे जाऊन आढावा घेतला होता. एक आठवड्यापूर्वी कार्यक्रम निश्चित करताना हवामान खात्याचा असा कोणताही उष्णतावाढीचा धोका मिळालेला नव्हता. मात्र, ऐनवेळी अचानक उष्मा वाढला आणि त्याचा काही श्रीसेवकांना त्रास झाला. त्यात 13 जणांचे दुर्दैवी मृत्यू झाले, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

विरोधकांकडून सरकारवर टीका

दरम्यान, आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईतल्या एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा कार्यक्रम राजभवनावर घ्यायला हवा होता असे सांगितले. केवळ राजकीय दृष्टीने इतक्या लोकांना येथे बोलावण्यात आले, अशी टिपण्णी त्यांनी केली. हा कार्यक्रम संध्याकाळी का घेतला नाही, असा सवालही त्यांनी केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या लोकांची विचारपूस केली. त्यानंतर बोलताना त्यांनी आयोजक सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही घटना अत्यंत वेदनादायी व शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. हा कार्यक्रम सरकारचा होता. त्यामुळे लोकांची व्यवस्था करणे ही सरकारची जबाबदारी होती. पण ती केली गेली नाही. त्यामुळे या घटनेप्रकरणी शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content