Homeपब्लिक फिगरअचानक उष्मा वाढल्याने...

अचानक उष्मा वाढल्याने श्रीसेवकांचा मृत्यू!

नवी मुंबईतल्या खारघर येथील महाराष्ट्र भूषण देण्याच्या कार्यक्रमाची वेळ सर्वांच्या सोयीसाठी सकाळची ठरवण्यात आली होती. मात्र दोन दिवसात अचानक उष्मा वाढला आणि परिणामी उष्माघातामुळे 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली होती. रुग्णवाहिका तैनात होत्या. पाण्याचे टँकरची सोय होती. नळ बसवण्यात आले होते. वैद्यकीय पथके तयार ठेवण्यात आली होती. हा कार्यक्रम संध्याकाळी घ्यावा असे आमचे मत होते. परंतु कार्यक्रम संपल्यानंतर श्रीसेवकांची जाण्याची गैरसोय होईल म्हणून हा कार्यक्रम सकाळच्या वेळेत घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे सत्कारमूर्ती डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याशी चर्चा केली. लोकांच्या सोयीसाठी तसेच इतर मान्यवरांच्या दृष्टिकोनातून सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले, असे त्यांनी सांगितले.

आपण स्वतः पाच दिवस तेथे होतो. ठाण्याचे, पालघरचे पालकमंत्री तेथे लक्ष ठेवून होते. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा स्वतः तिथे जाऊन आढावा घेतला होता. एक आठवड्यापूर्वी कार्यक्रम निश्चित करताना हवामान खात्याचा असा कोणताही उष्णतावाढीचा धोका मिळालेला नव्हता. मात्र, ऐनवेळी अचानक उष्मा वाढला आणि त्याचा काही श्रीसेवकांना त्रास झाला. त्यात 13 जणांचे दुर्दैवी मृत्यू झाले, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

विरोधकांकडून सरकारवर टीका

दरम्यान, आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईतल्या एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा कार्यक्रम राजभवनावर घ्यायला हवा होता असे सांगितले. केवळ राजकीय दृष्टीने इतक्या लोकांना येथे बोलावण्यात आले, अशी टिपण्णी त्यांनी केली. हा कार्यक्रम संध्याकाळी का घेतला नाही, असा सवालही त्यांनी केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या लोकांची विचारपूस केली. त्यानंतर बोलताना त्यांनी आयोजक सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही घटना अत्यंत वेदनादायी व शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. हा कार्यक्रम सरकारचा होता. त्यामुळे लोकांची व्यवस्था करणे ही सरकारची जबाबदारी होती. पण ती केली गेली नाही. त्यामुळे या घटनेप्रकरणी शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Continue reading

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...

बंगालमध्ये राजकीय ‘ग्रँड स्लॅम’! लिएंडर पेसला भाजपमध्ये ‘स्पेस’!!

भारताचा दिग्गज टेनिसपटू आणि 'कोलकाता बॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिएंडर पेस याने मंगळवारी नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून राजकीय खळबळ उडवली. बंगाली माध्यमांच्या मते, २०२१मध्ये गोव्यात ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश करणाऱ्या पेसने आता 'घासफूल'...

केरळमध्ये डाव्या आघाडीच्या सरकारसाठी मोदी प्रयत्नशील!

केरळमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी कन्नूर येथील जाहीर सभेत सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर कडाडून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केरळमध्ये डाव्या आघाडीचे...
Skip to content