Homeपब्लिक फिगरअचानक उष्मा वाढल्याने...

अचानक उष्मा वाढल्याने श्रीसेवकांचा मृत्यू!

नवी मुंबईतल्या खारघर येथील महाराष्ट्र भूषण देण्याच्या कार्यक्रमाची वेळ सर्वांच्या सोयीसाठी सकाळची ठरवण्यात आली होती. मात्र दोन दिवसात अचानक उष्मा वाढला आणि परिणामी उष्माघातामुळे 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली होती. रुग्णवाहिका तैनात होत्या. पाण्याचे टँकरची सोय होती. नळ बसवण्यात आले होते. वैद्यकीय पथके तयार ठेवण्यात आली होती. हा कार्यक्रम संध्याकाळी घ्यावा असे आमचे मत होते. परंतु कार्यक्रम संपल्यानंतर श्रीसेवकांची जाण्याची गैरसोय होईल म्हणून हा कार्यक्रम सकाळच्या वेळेत घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे सत्कारमूर्ती डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याशी चर्चा केली. लोकांच्या सोयीसाठी तसेच इतर मान्यवरांच्या दृष्टिकोनातून सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले, असे त्यांनी सांगितले.

आपण स्वतः पाच दिवस तेथे होतो. ठाण्याचे, पालघरचे पालकमंत्री तेथे लक्ष ठेवून होते. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा स्वतः तिथे जाऊन आढावा घेतला होता. एक आठवड्यापूर्वी कार्यक्रम निश्चित करताना हवामान खात्याचा असा कोणताही उष्णतावाढीचा धोका मिळालेला नव्हता. मात्र, ऐनवेळी अचानक उष्मा वाढला आणि त्याचा काही श्रीसेवकांना त्रास झाला. त्यात 13 जणांचे दुर्दैवी मृत्यू झाले, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

विरोधकांकडून सरकारवर टीका

दरम्यान, आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईतल्या एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा कार्यक्रम राजभवनावर घ्यायला हवा होता असे सांगितले. केवळ राजकीय दृष्टीने इतक्या लोकांना येथे बोलावण्यात आले, अशी टिपण्णी त्यांनी केली. हा कार्यक्रम संध्याकाळी का घेतला नाही, असा सवालही त्यांनी केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या लोकांची विचारपूस केली. त्यानंतर बोलताना त्यांनी आयोजक सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही घटना अत्यंत वेदनादायी व शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. हा कार्यक्रम सरकारचा होता. त्यामुळे लोकांची व्यवस्था करणे ही सरकारची जबाबदारी होती. पण ती केली गेली नाही. त्यामुळे या घटनेप्रकरणी शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content