गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर दौरे झाले. धावपळीत विश्रांती व्यवस्थित मिळाली नाही. दौऱ्याची दगदग, झोप व्यवस्थित न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून तब्येत बिघडली. त्यामुळे दौरा सोडून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी विश्रांती घेत होतो. मात्र माध्यमांनी ‘नॉट रिचेबल…’च्या चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे माझी विनाकारण बदनामी झाली. माध्यमांनी विनाकारण बदनामी करणे थांबवावे. खात्री करुनच यापुढे माध्यमांनी बातम्या द्याव्यात. माझ्याविषयी चुकीच्या बातम्या चालविल्यामुळे व्यथित झालो, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत यापुढे माध्यमांनी खात्री करुनच बातम्या दाखवण्याची सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केली.
काल रात्रीपासून काही माध्यमांवर अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार अज्ञात स्थळी रवाना झाल्याच्या तसेच ते सर्व नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या चालविल्या जात होत्या. याबद्दल अजितदादांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. काल शुक्रवारी, पुण्यात होतो. दुपारपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार माझा कार्यक्रम सुरू होता. मात्र गेले काही दिवस मी महाराष्ट्रभर दौऱ्यावर होतो. या दौऱ्याच्या काळात प्रचंड दगदग झाली. विश्रांती मिळाली नाही. झोपही पूर्ण होत नव्हती. त्याचा प्रतिकुल परिणाम माझ्या तब्येतीवर झाला, असे ते म्हणाले.
पित्त वाढले. त्यामुळे काल दुपारी अचानक अस्वस्थ वाटायला लागले. डॉक्टरांचा सल्ला घेत औषधे घेऊन पुण्यातल्या ‘जिजाई’ या निवासस्थानी विश्रांती घेतली. मात्र या काळात मी ‘नॉट रिचेबल…’ असल्याच्या चुकीच्या बातम्या माध्यमांनी चालविल्या. कोणतीही खातरजमा न करता एखाद्याची किती बदनामी करायची यालाही काही लिमीट असते. माध्यमात माझ्याविषयी आलेल्या बातम्या बघून मी व्यथित झालो, असे दादा म्हणाले.
आम्ही पब्लिक फिगर असल्याने आमच्याविषयी बातम्या करण्याचा माध्यमांना अधिकार आहे. मात्र कोणतीही खातरजमा न करता चुकीच्या बातम्या चालविणे योग्य नाही. यापुढे माध्यमांनी खात्री करुनच बातम्या चालवाव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

