मुंबईतल्या अंधेरी येथील अद्ययावत कामगार हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाणार नाही. पुढील तीन महिन्यांत रूग्णालयाचा बाह्यरूग्ण विभाग (ओपीडी) सुरू करू व सहा महिन्यांत पूर्ण हॉस्पिटल सुरू केले जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी दिली आहे.
कामगारांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या अंधेरीतील कामगार हॉस्पिटलप्रश्नी राजेश शर्मा यांनी आवाज उठवला होता. हे हॉस्पिटल उद्योगपतींच्या घशात घालू नका व एका महिन्यात हॉस्पिटल सुरू करा, अन्यथा तीव्र लढा दिला जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता. याची केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी तत्काळ दखल घेऊन आज एका बैठकीचे आयोजन केले होते. यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या सचिव आरती आहुजा यांनी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निर्देशानुसार बैठक घेतली. या बैठकीत ESICचे डायरेक्टर जनरल डॉ. राजेंद्र कुमार, राज्य सरकार व केंद्र सरकारचे उच्च अधिकारी, राजेश शर्मा व काँग्रेसच्या उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष क्लाईव्ह डायस उपस्थित होते.
काही तांत्रिक अडचणीमुळे हॉस्पिटल सुरू होण्यास विलंब होत आहे. परंतु यातून लवकरच मार्ग काढून पुढील तीन महिन्यात OPD विभाग सुरू करु व सहा महिन्यांत हॉस्पिटलच्या सर्व सेवा सुरू केल्या जातील, असे आश्वासन या बैठकीत देण्यात आले.
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या या हॉस्पिटलमध्ये ५०० बेड्स व मेडिकल कॉलेज होते. या रुग्णलयात OPD, IPD (350 बेड्स), ICU आणि सुपर स्पेशालिटी सुविधा २४ तास सुरू होत्या. पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, एक्स-रे, सीटी-एमआरआय, ऑपरेशन थिएटरसह सर्व सोयीसुविधांनी हे रुग्णालय सुसज्ज होते. OPD विभागात दररोज १८०० ते २००० रुग्ण भेट देत होते. ब्लड बँकेची सुविधाही उपलब्ध होती. महाराष्ट्रातील अनेक शहरातील कामगार अंधेरीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत होते. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात होत्या. परंतु १७ फेब्रुवारी २०१८ रोजी या रुग्णालयात आगीची दुर्घटना घडून १३ जणांचा मृत्यू झाला व १५० जण जखमी झाले. तेव्हापासून हे रुग्णालय बंद आहे. अंधेरीतील हे हॉस्पिटल लवकर सुरू करावे अशी कामगारांची मागणी आहे. सरकारने आता आश्वासन दिले असले तरी हे हॉस्पिटल सुरू होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहिल, असे राजेश शर्मा म्हणाले.

