कालपासून आम्ही जो तमाशा बघतो आहोत तो नारायण राणे यांच्या वाक्याचा राग आहे की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जे अज्ञान उघड झाले, त्याबद्दलचा हा थयथयाट आहे? त्यांच्या ज्ञानसंवर्धनासाठी भारतीय जनता युवा मोर्चा 75 हजार पत्रे पाठविण्यात येतील, असे भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी आज एका पत्रकार परिषदेत जाहीर केले.
मुख्यमंत्री ज्यावेळी मंत्रालयासमोरुन 15 ऑगस्टला महाराष्ट्राला संबोधित करीत होते त्यावेळी त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाविषयी जाहीर कार्यक्रमात चुकीचा उल्लेख केला. असा उल्लेख करणे म्हणजे स्वातंत्र्यदिनाचा जाणूनबुजून उपमर्द असल्याने मुख्यमंत्र्यांनी याविषयी भूमिका स्पष्ट करावी. देशातील स्वातंत्र्यसैनिक, जनता, सैनिक यांचा अपमान त्यांनी केला. हे सारे देशाने पाहिले. याबाबत मुख्यमंत्री जनतेकडे क्षमायाचना करणार आहेत काय? हे जाणीवपूर्वक केले गेले का? अज्ञानातून घडले का? ही शंका का निर्माण करत आहेत? हीरक महोत्सव, की अमृतमहोत्सव याबाबत शंका उपस्थित केली. याबाबत स्पष्टीकरण होण्याची गरज आहे. मुख्यमंत्री अमृतमहोत्सव विसरले आहेत. म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे स्मरण करून देण्यासाठी ७५ हजार पत्रे पाठवतील, असेही आ. शेलार यांनी जाहीर केले. त्यानंतरही त्यांना स्मरण झाले नाही तर आम्ही गांधीगिरी करुन फुल नाही तर काटे पाठवू, असा इशाराही त्यांनी दिला.
फोन प्रकरणाची सीबीआय चौकशी करा
भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांना आदेश देणारे राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांची भूमिका संशयास्पद असून या प्रकरणाची सीबीआयने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
ज्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झालेली नव्हती, त्यापूर्वीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब दूरध्वनीवरुन अनेक संशयास्पद बाबी बोलत असल्याची ध्वनीफित समोर आली आहे. राणे यांच्या अटकेसाठी पोलीस यंत्रणेवर दबाव आणत होते, न्यायालयाबाबत काही गंभीर विधाने करुन अपमान करीत असल्याची व्हिडीओ क्लीप समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत (सीबीआय) चौकशी होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब काल 11 ते 1 वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या बैठकीत होते. त्या दरम्यान एका आयपीएस अधिकाऱ्याला दूरध्वनीवरून नारायण राणे यांना अटक करण्यासंदर्भात आदेश देत असल्याची ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध झाली आहे. यावेळी अनिल परब उच्च न्यायालयाने व सत्र न्यायालयाने राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्याचे सांगत आहेत. खरे तर त्यावेळेस राणे यांच्या जामीनअर्जाची सुनावणीच सुरू झाली नव्हती. किंबहुना जामीनासाठी अर्जही केलेला नव्हता, त्याची प्रक्रियाही सुरू झालेली नव्हती. त्याबद्दल आधीच ती नाकारली जाणार याबाबत ते विधान करत आहेत. परब हे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे असे सांगत आहेत. असे वक्तव्य करून परब यांनी न्यायालयाचा अपमान केला आहे. गृहमंत्री नसतानाही परब यांनी राणे यांच्या अटकेसाठी आयपीएस अधिकाऱ्यावर दबाव आणल्याचेही या संवादातून दिसत आहे. अनिल परब गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकदा नाराजी व्यक्त केली होती. कालही हेच अधोरेखित झाले आहे. परब यांचा गृह खात्यामधला हस्तक्षेप गंभीर आहे, असेही शेलार म्हणाले.
न्यायालयाचा निवाडा आधीच घोषित
याचा अर्थ दलालांमार्फत किंवा या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचा मंत्रिमहोदयांनी प्रयत्न केला ही शंका दाट आहे. मुंबई उच्च न्यायालयाचाही उल्लेख आहे. याचा अर्थ मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे. या संभाषणामुळे या प्रकरणातील संशय वाढला आहे. म्हणूनच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची गरज आहे. अंतिमत: आयपीएस अधिकारी केंद्राला जबाबदार असतात. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, राज्याचा एक मंत्री आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या अटकेसाठी फोन करत होते. त्यामुळे मंत्री आणि आयपीएस अधिकाऱ्यांमधील संभाषणाची चौकशी होण्याची गरज आहे, असे आमदार शेलार यांनी सांगितले.
लक्ष विचलीत करण्यासाठी हिंसक घटना
राज्यात अलीकडेच मंत्रालयासमोर, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभेत काही शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांतून राज्य सरकारविषयी असलेला असंतोष प्रकट होऊ लागला आहे. या घटनांवरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी राणे यांना अटक व त्यानिमित्ताने हिंसक घटना घडविल्या जात असाव्यात असा संशय येतो, असेही ते म्हणाले.
राणे मुख्यमंत्री असतानाही षडयंत्र
नारायण राणे मुख्यमंत्री होते त्यावेळीही उद्धव ठाकरेंनी षडयंत्र केले. कोकणातील आमच्या सुरेश प्रभूंना केंद्रात मंत्रीपद मिळाले, त्यावेळी ठाकरेंनी तेच केले. आता कोकणातील नेत्याला केंद्रात मोठे पद मिळाले त्यांना अटक केली. कोकणी माणसाल सन्मान मिळाला की उद्धव ठाकरेंच्या पोटात का दुखते, असा सवालही त्यांनी केला.
संयमी माणसाबरोबर राहूनही संकुचित
तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांना एका व्यक्तीने दुर्दैवी घटनेत कानशिलात लावलेली देशाने पाहिली. पण त्यावेळी शरद पवारांनी संयम पाळून त्या व्यक्तीला माफ केले. पण या संयमी माणसासोबत राहूनही शिवसेना संकुचित का राहते, असा टोला लगावत सुरुवात तुम्ही केलीत, शेवट आम्ही करू, असा इशाराही शेलार यांनी दिला.

