Details
संसदेत पत्रकार!
12-Jan-2019
| 1
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पत्रकार यांचे नाते म्हणजे न सुटणारे कोडे होते. बाळासाहेब पत्रकारांवर अनेकदा टीका करत. त्यावर पत्रकारांकडूनदेखील त्यांना समर्पक उत्तर मिळत असे. शिवसैनिकांनी पत्रकारांवर हल्ला केल्यानंतर तर बाळासाहेब आणि पत्रकार यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते निर्माण झाले होते. पण असे असूनही बाळासाहेबांनी पत्रकारांवर कधी डूख धरला नाही. त्यांनी पत्रकारांवर सदैव प्रेम केले. परिणामी, शिवसेनेच्या कोट्यातून अनेक पत्रकार लोकसभेवर आणि राज्यसभेवर निवडून गेले. कै. विद्याधर गोखले आणि कै. नारायण आठवले हे शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले, तर संजय निरूपम, संजय राऊत, प्रितीश नंदी, भारतकुमार राऊत हे पत्रकार राज्यसभेवर गेले. सारांश, स्वत: पत्रकार असलेल्या बाळासाहेबांनी अनेक पत्रकारांना संसद दाखविली.
येथे एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे 1989 साली आम्हालादेखील शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून जाण्याची संधी आली होती. पण आम्ही ती नम्रपणे नाकारली. त्याचे असे झाले: दक्षिण-मध्य मुंबईतून शिवसेनाप्रमुखांना वामनराव महाडिक या विद्यमान खासदाराऐवजी नवा उमेदवार द्यायचा होता. त्यांनी अग्रलेखांचे बादशहा नीळकंठ खाडिलकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली. पण निळूभाऊंनी ती नाकारली. मग बाळासाहेब त्यांना म्हणाले, `तुम्ही उभे राहणार नसाल तर मला तुमचा उमेदवार द्या. तुम्ही दगड दिलात तरी मी त्याला निवडून आणीन.’ निळूभाऊंनी दक्षिण-मध्य मुंबईतून आम्ही उभे राहावे असे आम्हाला सुचविले. बाळासाहेबांनी आमच्या नावाला मान्यतादेखील दिली. पण आम्ही नम्रपणे नकार देताच भाऊ म्हणाले, `तुला शरद पवारांनी उमेदवारी दिली असती तर नाही म्हणाला असतास का?’ यावर आदरणीय भाऊंपुढे आम्ही निरूत्तर झालो. मग भाऊंनी बाळासाहेबांना सांगितले, `माझ्या डोळ्यासमोर एकच उमेदवार होता, तो म्हणजे नरेंद्र वाबळे. पण त्याने नकार दिला आहे. तुम्ही तुमचा उमेदवार ठरवा.’ अशाप्रकारे खासदार बनण्याची संधी आम्ही स्वत:हून नाकारली. मग बाळासाहेबांनी मोहन रावले यांना उमेदवारी दिली. ते पुढे पाच वेळा खासदार झाले.
या साऱ्या आठवणी ताज्या व्हायचे कारण असे की, गुरूवारी मुंबई मराठी पत्रकार संघात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आम्ही त्यांना विचारले, `शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आगामी निवडणुकीत तुम्ही एकातरी पत्रकाराला उमेदवारी देणार का?’ त्यावर रामदासजी उत्तरले, `शिवसेना हा मोठा पक्ष आहे. त्यांच्याकडे जागा अधिक असतात. आमचा पक्ष छोटा आहे. आमच्या वाट्याला कमी जागा येतात. पण आपण जर आमच्या पक्षात येण्यास तयार असाल, तर आपल्याला लोकसभेची उमेदवारी देण्याची आमची तयारी आहे.’ रामदासजींचे हे उत्तर आम्हाला अनपेक्षित नव्हते. बाळासाहेबांप्रमाणेच रामदासजीदेखील पत्रकारांचे सच्चे मित्र आहेत. आमचे आणि त्यांचे गेल्या तीन दशकांपासून घनिष्ट मैत्रीचे संबंध आहेत. या प्रेमातूनच रामदासजींनी आम्हाला लोकसभा उमेदवारीची ऑफर दिली असावी. पण राजकारण हे साधे सरळ नसते. आमच्यासारख्या सरळमार्गी माणसाचे क्षेत्र हे राजकारण असूच शकत नाही. म्हणूनच यापूर्वी निवडून येण्याची मोठी शक्यता असतानाही आम्ही लोकसभेची उमेदवारी नाकारली होती. आजही आम्ही तेच आहोत. पुढे अधिक काय बोलणार?”

