HomeArchiveवंचित बहुजनाची आघाडी...

वंचित बहुजनाची आघाडी युती-आघाडीला भारी!

Details
वंचित बहुजनाची आघाडी युती-आघाडीला भारी!

    21-Jan-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
आपल्या महाराष्ट्राचं ‘जनमत’ कधी कुणाला डोक्यावर घेईल अन् कधी कुणाला आपटेल याचा अंदाज कुणालाच बांधता येणार नाही. पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला सत्ता गाजविण्याची संधी दिल्यानंतर या आघाडीला मुळासकट उखडून फेकून 2014 मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टी युतीला महाराष्ट्रवासीयांनी डोक्यावर घेतले. मात्र साडेचार वर्षे एकत्र नांदूनही कायम नळावरची भांडण करणार्‍या युतीने ‘अच्छे दिन’ दिवसा व रात्रीही दाखवल्याने आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत इथला शेतकरी, कामगार, वंचित, शोषित, पीडित त्यांना मतांचे दान नक्कीच भरभरून करणार आहे? हे दान नक्की कोणत्या स्वरूपात असेल हे आताच सांगता येणार नाही. आघाडी, युती, तिसरी आघाडी, छोट्या-मोठ्या घटकपक्षांचा दबावगट हे महाराष्ट्रासाठी नवे नाही. महाराष्ट्रात धनगर, माळी आणि वंजारी हे मतांचे गणित जो पक्ष बांधतो त्याला सत्तेची जुळवणी करणे फारसे कठीण जात नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार या गणितामुळे महाराष्ट्रातील ‘जुने जाणते’ म्हणून ओळखले जातात.

परंतु, ओबीसी, एसी, एस-टी, मराठा वर्गात आजही सत्ता व पदापासून वंचित असलेले असंख्य कार्यकर्ते आहेत. घराणेशाहीनुसार चालत आलेल्या त्या-त्या समाजात एक वर्ग, एक घराणं प्रबळ होत गेलं. अन् त्यांच्या पाठीशी भक्कीने उभा राहिलेला कार्यकर्ता कायम सतरंज्याच उचलत राहिला. त्याच दादा, भाऊंचे साखर कारखाने, त्यांच्याच ताब्यात सहकारी व जिल्हा बँका. जिल्हा-तालुका-गाव-पंचायत, नगरपालिका-महापालिका सर्व काही त्यांचंच. मग, आमदारकी, खासदारकीसाठी कोटींचं ‘मापटं’ हायकमांडला पोहोचवणं या वंचितांना कसं जमेल? परंतु भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष तथा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या रूपात गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात बहुजन वंचितांसाठी एक वेगळीच हवा आणि पोषक वातावरण तयार झाले आहे.

औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती, बीड, नांदेड असा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार्‍या बहुजन वंचित आघाडीच्या सभांना मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता राज्यात नव्या पर्यायाची चर्चाही सुरू झाली आहे. वंचित मराठा, वंचित एसी-एसटी, वंचित मातंग, माळी, धनगर आणि त्याला ‘एमआयएम’च्या रूपाने मिळालेली वंचित मुस्लिमांची ताकद यामुळे या आघाडीवर मीडियाचा फोकस नसला तरी युती-आघाडीच्या तंबूत प्रचंड खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात व देशात सत्तेचा मार्ग हा जाती-जातींतून जातो. परंतु या जातींना वर्षानुवर्षे आपसांत लढवून प्रत्येक जातीतला मूठभर इथ पारंपरिक सत्ता गाजवत आला आहे. घराणे आणि विशिष्ट आडनाव घेतल्यावर महाराष्ट्रात त्या भागातील दादा नेत्याचं नाव पुढं येतं. त्याला पर्याय, टक्कर द्यायची असेल तर तिथल्या लोकांमधील स्वाभिमान जागृत करायला लागतो.

बहुजन वंचित आघाडीच्या रूपात पिढ्यान्पिढ्या सत्ता गाजवणार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. तो सूर ही आघाडी फक्त मते फोडणार असल्याने याचा लाभ आम्हालाच होईल, या भ्रमात आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला सोबत घेऊ पण, ओवेसींचा एमआयएम नको, अशी अटकळ बांधणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दस्तुरखुद्द असुद्दीन ओवेसी यांनी, तुम्ही प्रकाश आंबेडकरांना सन्मानजनक जागा द्या मी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, असे आवाहन केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निवडणूक हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघासोबत आघाडीसाठी माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांसोबत बोलणीही सुरू झाली आहेत. या आघाडीला आंबेडकरांच्या मागणीनुसार सन्माजनक जागा न मिळाल्यास महाराष्ट्रात वेगळीच राजकीय गणिते पाहायला मिळणार आहेत. आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीच्या सभांतून भाजपावर वारंवार निशाणा साधला जात असला तरी आंबेडकर हे अप्रत्यक्ष भाजपाला मदत करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.

शिवसेनेने जर भाजपासोबत शेवटपर्यंत जुळवून घेतले नाही तर ती काँग्रेसला मदत नाही का? (इति.‘सामना’तून राहुल ब्रिगेडचे कौतुक सोहळे). काँग्रेसला मुस्लिमांची मते चालतात पण, आपली पारंपरिक ‘वोट बँक’ फोडणारी एमएआयएम नको. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीत आजघडीला ओबीसींपासून प्रत्येक समाजाचे सेल आहेत. पण सत्तेपासून आजही दूर राहिलेल्या या सेलमधील किती वंचितांना आमदार, खासदारकीची तिकिटे मिळाली? तो तिकिट वाटपाचा कार्यक्रम बहुजन वंचित आघाडीच्या निमित्ताने महाराष्ट्रात घडल्यास वंचितांना खरे बळ मिळेल. आघाडी, युती, महाआघाडी ही समीकरणे सध्या देश आणि राज्यपातळीवर सुरू आहेत. उत्तर प्रदेशात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले सपा-बसपा आपले संस्थान खालसा होईल, या भीतीपायी एकत्र येतात. मग, इथे बहुजन सारे एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ!.. हा नारा समस्त वंचित बहुजनांनी शेवटपर्यंत जिवंत ठेवल्यास आमचा वाटा कुठं हाय हो, असा पारंपरिक सवाल करण्याची गरज पडणार नाही!”
 

Continue reading

न्यायालये माणसे चालवतात, एआय नाही!

"न्यायालयं ही माणसांद्वारे चालवली जातात, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) नाही," अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळून लावली. २०२१पासून प्रलंबित असलेल्या एका 'प्रथम अपिलावर' प्राधान्याने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीशांच्या मानवी मर्यादा...

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...
Skip to content