Details
लोढांचे डोके आहे की खोके?
07-Jan-2019
| 0
”
नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
भारतीय जनता पार्टीचे मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी गेल्या शुक्रवारी एक कुकर्म केले. हेल्मेटला विरोध करीत त्यांनी दक्षिण मुंबईत मोटारसायकलस्वारांची रॅली काढली. या रॅलीचे वैशिष्टय म्हणजे रॅलीतील मोटारसायकलस्वारांनी हेल्मेटचा त्याग केला होता. ते बोडक्या डोक्याने मोटारसायकल चालवित होते. स्वत: लोढा एका मोटारसायकलस्वाराच्या मागच्या आसनावर हेल्मेटशिवाय बसले होते. नंतर त्यांनी पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर बंडखोरपणे ही रॅली थांबविली. आपल्या मतदारसंघात छोट्या अंतरासाठी मोटार सायकलस्वारांना हेल्मेटची सक्ती करू नये, अशी बालिश आणि बिनडोक मागणी त्यांनी पोलीस उपायुक्तांकडे केली. अर्थात, उपायुक्त ज्ञानेश चव्हाण यांनी ती फेटाळली. पण लोढांच्या या उद्योगामुळे या अब्जाधीश लोकप्रतिनिधीकडे डोके आहे की खोके, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोणताही लोकप्रतिनिधी माणसाच्या सुरक्षिततेसाठी असलेला कायदा मोडण्यास चिथावणी देणार नाही. पण सवंग लोकप्रियतेसाठी लोढा यांनी करू नये ते केले. त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. 1988 च्या मोटार वाहन कायदा कलम 128 आणि 129 नुसार दुचाकीस्वाराने हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. तसे निकाल वेळोवेळी मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर लोढा यांनी कायदा पायदळी तुडविण्यास चिथावणी दिली आहे. म्हणजेच त्यांनी न्यायालयाचा अवमानदेखील केला आहे. सरकारने त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
हेल्मेटचे महत्त्व
आता आम्ही बिनडोक लोढा यांना हेल्मेटचे महत्त्व थोडक्यात सांगत आहोत. डोक्यावर हेल्मेट नसताना दुचाकीस्वाराला अपघात झाल्यास त्याच्या मेंदूला गंभीर इजा होऊ शकते. तो कमी वेगाने चालला असला तरीही अशी इजा अटळ असते. म्हणूनच डोक्याची काळजी घेण्यासाठी हेल्मेट आवश्यक असते. हेल्मेटमुळे माणसाचे प्राण वाचण्याची शक्यता कैक पटीने वाढते. राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासनाने 2012 साली दिलेल्या आकडीवारीनुसार हेल्मेटमुळे 1699 लोकांचे प्राण वाचले. अमेरिकेत 2008 ते 2010 या काळात 14,283 दुचाकीस्वार अपघातात ठार झाले. त्यांपैकी 6057 (42 टक्के) दुचाकीस्वार केवळ हेल्मेट न घातल्यामुळे प्राणास मुकले.
कोणताही अपघात हा ठरवून होत नसतो. तो कधीही आणि कोठेही होऊ शकतो. दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नसेल तर त्याच्या मेंदुला गंभीर इजा होऊ शकते. परिणामी, त्याचा हॉस्पिटलमधील मुक्काम वाढतो, औषधोपचाराचा खर्च वाढतो, त्याचे भावी आयुष्य वेदनामय होऊ शकते. मेंदुला इजा झाल्याने मणक्यालादेखील दुखापत होऊ शकते. माणूस कायमचा अपंग होऊ शकतो. अथवा अपघातानंतर काही दिवसांत किंवा काही आठवड्यांत या जगाचा निरोप घेऊ शकतो. मंगलप्रभात लोढांना हे ठाऊक नाही काय? त्यांना जर दुचाकीस्वारांना होत असलेल्या हेल्मेटच्या अडचणीची इतकी चिंता वाटत असेल तर त्यांनी आपल्या मतदारसंघात दुचाकीस्वारांना मोफत मोटारी वाटाव्यात. अब्जाधीश लोढांना तसे करणे सहज शक्य आहे. उगाच सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी हेल्मेटला विरोध करून तरूण-तरूणींची दिशाभूल करू नये. त्यांचे प्राण धोक्यात आणू नयेत. तूर्त एवढेच!”

