HomeArchive‘बेस्ट’च्या मुळावर उठलंय...

‘बेस्ट’च्या मुळावर उठलंय तरी कोण?

Details
‘बेस्ट’च्या मुळावर उठलंय तरी कोण?

    11-Jan-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
आपली मुंबई कामगारांची, कष्टकर्‍यांची उजाडल्यापासून मावळेपर्यंत संघर्ष हेच जगण्याचे गाणे गाणार्‍यांची. परंतु झोपडी, चाळ, वसाहतींत राहणारा इथला महापालिका अथवा सरकारी सेवेपुरता उरला-सुरला कामगारही संपविण्याचा त्याला देशोधडीला लावण्याचा विडा आपल्यातील कही दलाल कंपनीने केव्हाच उचलला आहे. ते सत्तेतील की सत्तेबाहेरील? याला महत्त्व नाही. पण, आपलीच माणसं काही संधीसाधू उद्योगपतींच्या तालावर नाचून मुंबईतील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या बेस्ट बसचे अस्तित्त्व संपविण्यासाठी उठले आहेत. आता बेस्ट कर्मचार्‍यांचा संप आणि त्यांची एकजूट हेच शेवटचे हत्यार बेस्ट बसला वाचविण्यासाठी ठरणार आहे.

बेस्ट बसमध्ये सेवेकरी म्हणून काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी त्यांना बोनस, पगारवाढ आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारणे हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो का? तर हो! ज्यांनी बेस्टची आर्थिक डबघाईला असल्याचे वारंवार दाखवून उपाययोजनांची गाजरं केवळ हवेत उडवली त्यांच्या सत्तेत हेही घडू शकते. अन्यथा ‘बेस्ट वाचवा’ ही मोहीम मुंबईत तमाम मुंबईकरांना साद घालून का सुरू करावी लागेल? बेस्टच्या 30 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी संपाचे हत्यार उगारल्याने मुंबईकरांचे हाल झाले. रिक्षा, टॅक्सी खासगी वाहतूकदारांनी त्यांना लुटले, अनेक मुंबईकरांना पायपीट करावी लागली. या बातम्या वर्तमानपत्रात अगदी तेलमीठ लावून छापून येतील. पण, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम हा मुंबई व उपनगरात एकत्र नांदणार्‍या सार्वजनिक उपक्रमाला एकाएकी सुरुंग लागला कसा? मुंबईत बेस्ट बसने प्रवास करणारा प्रवासीच आता उरला नाही का? तोट्याचे मार्ग बेस्टने बंद केले, मग फायद्याच्या मार्गावरही बेस्टला लाभ होत नाही का? दक्षिण मुंबईपासून दहिसर ठाणे ते नवी मुंबईपर्यंत पसरलेले बेस्टचे जाळे आणि तिची सेवा नव्याने विस्तारत चालेल्या शहरवासीयांना नकोशी आहे का? या प्रश्नांची अपेक्षित उत्तरे बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांना कधी दिली? बेस्ट तोट्यात चालली म्हणून तिकिट दरात वाढ करणार्‍या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांना आपलंस करण्यासाठी काळाच्या ओघात कोणत्या उपाययोजना आखल्या? डिजिटल सेवेसाठी ट्रायमॅक्स कंपनीच्या मशीन आणून काही काळ तिकिटासाठी टिकटिक बंदी झाली. पण, या मशीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर बेस्ट वा प्रशासनाकडून प्रवाशांना विश्वासात घेणारा कोणता खुलासा झाला?

बेस्ट फायद्यात-तोट्यात जाण्यासाठी कारणे अनेक असतील. पण, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिणेपर्यंत प्रवासाठी मुंबईकरांची हक्काची व जिव्हाळ्याची असलेली बेस्ट-बसला राजकारणाचा बळी ठरवले जात नाही ना? या शंकेला वाव आहे. राज्य सरकारमार्फत आजघडीला मुंबईच्या चहूबाजूला खोदकाम करून भुयारी मेट्रोचे जाळे विणले जात आहे. घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर मेट्रो धावू लागल्यानंतर येथे बेस्टसाठी तेच सुगीचे दिवस राहिले का? चेंबूर ते वडाळा मार्गावर मोनो रेल उभारल्यानंतर बेस्ट बसला तोटा सहन करावा लागला का? याच मोनोरेलचे जाळे कुर्ला, दादर, लोअर परळपर्यंत विस्तारल्यास बेस्ट बसचा पर्याय किती प्रवासी निवडतील? ज्या मार्गावर बेस्ट आहे तेथे मोनो व मेट्रो नको, ही भांडणेही आपण पक्षीय आणि प्रशासकीय स्तरावर ऐकलीच असतील. दक्षिण मुंबईत मेट्रोसाठी खोदकाम करताना मुंबई महापालिकेला विचारात घेतले नाही म्हणून सरकार महापालिकेतील सत्ताधारी कलगीतुरा आपण पाहिला आहे. बेस्ट कर्मचार्‍यांच्या विविध संघटनांनी पुकारलेल्या संपात महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना सहभागी झालेली नाही. हा संप कृती समितीचा आहे. हे फाटाफुटीचे राजकारण कामगार व मराठी माणसांच्या हिताचे आहे? आता बेस्ट प्रशासनावर कामगारांचा एक टक्काही विश्वास राहिलेला नाही. प्रशासनाने आतापर्यंत दिलेला एकही शब्द पूर्ण केलेला नाही. मग, संप करण्याशिवाय कामगारांचे पर्याय नाही. इथून तिथून मरणच आहे, ही निराशाच बेस्ट बस विकायला काढणार्‍यांची तयारी किती मोठी आहे, याची जाणीव करून देत आहे. बेस्टचा विद्युत पुरवठा उपक्रम रातोरात अंबांनींकडून अदानींकडे वळत असेल तर फक्त तोट्याचे गणित मांडणारी बेस्ट कामगारहित साधेल का? आपण सरकार आणि पर्यायायाने जनतेच्या ताब्यात असलेली एसटी, बस अथवा ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई-विरारची परिवहन सेवा एक दिवस बंद पडल्यास आपण कर्मचार्‍यांच्या नावाने बोटेमोड करतो. पण, जे रातोरात सौदेबाजी करून लाखो प्रवाशांच्या भावना पायदळी तुडवडतात ते कायम नामनिराळेच कसे?

बेस्ट बसमध्ये काम करणार्‍या 30 हजार 500 कर्मचार्‍यांनी कोणत्या अवास्तव मागण्या केल्या आहेत. 2007पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्माचार्‍यांना मिळणार्‍या 7,390 या मास्टर ग्रेडमध्ये वेतननिश्चिती करावी व एप्रिल 2016पासून लागू होणार्‍या नव्या वेतनकरारावर तातडीने काम सुरू करावे. बेस्टचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात सामावून घेण्याबाबत मंजुरी दिलेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करावी. 2016-17 व त्यापुढील वर्षासाठी पालिका कर्मचार्‍यांप्रमाणे बेस्टच्या कर्मचार्‍यांना बोनस, निवासस्थानाचा प्रश्न तसेच अनुकंपा भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी. पण, बेस्ट प्रशासनच कामगारांच्या प्रश्नांबाबत गंभीर नसेल तर त्यांनी न्याय तरी कुणाकडे मागायचा? संपामुळे हाल, संपकर्‍यांना मेस्मा, अमक्या एका राजकीय पक्षाच्या मध्यस्थीने संपावर तोडगा, सरकारची मध्यस्थी इथवरचं या आंदोलनाची व्याप्ती राहील? इतिहासाच्या दाखल्यात 1873 मध्ये बॉम्बे ट्रामवे कंपनी लि. ही कंपनी स्थापन झाली. तिने मुंबईत बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट हे नागरी वाहतूक आणि विद्युत केंद्र मुंबईत सुरू केले. 1905 मध्ये दक्षिण मुंबईतील वाडी बंदर येथे पहिले पॉवर स्टेशनही सुरू झाले. 1926 मध्ये बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेस कंपनीमार्फत मुंबईत बेस्टतर्फे मोटर बसेस सुरू करण्यात आली. 1920 मध्ये मुंबईत पहिली डबल डेकर ट्राम अवतरली तर 1926 मध्ये पहिली बस हा सर्व काही इतिहास जतन केला जातो. 1947 मध्ये बेस्ट महापालिकेच्या अखत्यारित गेली. 1995 मध्ये बेस्टचा नामविस्तार बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट असा झाला. डबल डेकर, सिंगल, डेकर, वातानुकूलित बसेस असा बेस्ट बसचा ऐतिहासिक प्रवास तमाम मुंबईकरांनी पाहिला, अनुभवला आहे. या इतिहासावर ओझरती नजर टाकणे आपल्या प्रत्येकासाठी क्रमप्राप्त आहेच. परंतु, मुंबईतील असंख्य कामगारांना देशोधडीला लावणारे धोरण, भांडवलदारांची तळी उचलणारे दलाल हेच सामान्यांच्या मुळावर उठल्याने आपल्यातील आतला मुंबईकर यापुढे कायम जिवंत ठेवणे हेच मोठे हत्यार ठरेल, हे वास्तव स्वीकारावेच लागेल!”
 

Continue reading

न्यायालये माणसे चालवतात, एआय नाही!

"न्यायालयं ही माणसांद्वारे चालवली जातात, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) नाही," अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळून लावली. २०२१पासून प्रलंबित असलेल्या एका 'प्रथम अपिलावर' प्राधान्याने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीशांच्या मानवी मर्यादा...

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...
Skip to content