Homeटॉप स्टोरीबुलेट ट्रेनच्या पालघरमधल्या...

बुलेट ट्रेनच्या पालघरमधल्या दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण

बुलेट ट्रेन प्रकल्पातल्या पालघरमधल्या दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या प्रकल्पाअंतर्गत राज्यातला हा पहिला पर्वतीय बोगदा आहे. विरार आणि बोईसर बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान पालघर जिल्ह्यातल्या सर्वात लांब बोगद्यांपैकी एक असलेल्या सुमारे 1.5 कि.मी. लांबीच्या पर्वतीय बोगद्यात (एमटी -5) ही महत्त्वपूर्ण प्रगती साध्य करण्यात आली आहे. एमटी-5 बोगद्याचे उत्खनन दोन्ही बाजूंनी करण्यात आले आणि अत्याधुनिक ड्रिल आणि ब्लास्ट पद्धतीचा वापर करून 18 महिन्यांत हे उत्खनन पूर्ण झाले. या पद्धतीमुळे उत्खनन करताना प्रत्यक्ष स्थितीचे बारकाईने निरीक्षण करणे शक्य झाल्याने प्रत्यक्ष जागेच्या परिस्थितीनुसार शॉटक्रिट, रॉक बोल्ट आणि लॅटिस गर्डरसारख्या आधार प्रणालींची उभारणी करणे शक्य झाले. बोगद्याचे खोदकाम सुरु असताना संपूर्ण कालावधीत वायुवीजन, अग्निरोधक यंत्रणा आणि इतर उपाययोजना तसेच प्रवेश व निर्गमन व्यवस्था काळजीपूर्वक पाळण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

याआधी सप्टेंबर 2025मध्ये ठाणे ते बीकेसीदरम्यान 5 किलोमीटर लांबीच्या पहिल्या भूमिगत बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे  प्रकल्पाची एकूण लांबी 508  किलोमीटर आहे. यामध्ये एकूण 27.4 किलोमीटर लांबीचे बोगदे असून, त्यापैकी 21 किलोमीटर भूमिगत बोगदे आणि 6.4 किलोमीटर भूपृष्ठावरील  बोगदे आहेत. या प्रकल्पांमध्ये आठ पर्वतीय बोगद्यांचा समावेश असून महाराष्ट्रात 6.05 किलोमीटर लांबीचे एकूण सात बोगदे आहेत तर गुजरातमध्ये 350 मीटर लांबीचा एक बोगदा आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत आहे आणि प्रकल्प सुरू झाल्यानंतर आणखी संधी उपलब्ध होतील, असे अश्विनी वैष्णव म्हणाले. मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वेमार्ग (एमएएचएसआर) प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे 508 किलोमीटर असून त्यापैकी 352 किलोमीटर गुजरात व दादरा-नगर हवेलीमध्ये आणि 156 किलोमीटर महाराष्ट्रात आहे. हा मार्ग साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सूरत, बिलीमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई या प्रमुख शहरांना जोडणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई-अहमदाबाद प्रवासाला फक्त 1 तास 58 मिनिटे इतका वेळ लागेल आणि त्यामुळे मोठ्या व्यापारी केंद्रांची अर्थव्यवस्था एकत्र जोडली जाईल. हा प्रकल्प मार्ग व्यापार‑उद्योगाची हालचाल वाढवेल. नवीन कारखाने व आयटी केंद्रे उभारण्यास मदत करेल. यामुळे दीर्घकालीन आर्थिक लाभ मिळतील आणि मध्यमवर्गीयांच्या आकांक्षा पूर्ण होतील. प्रवाशांना आरामदायी व परवडणारा प्रवास मिळेल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर रस्ते वाहतुकीच्या तुलनेत कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात सुमारे 95 टक्के घट होईल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सध्या 7 पर्वतीय बोगद्यांवर काम सुरू आहे. एमटी-1 (820 मीटर)ने 15% प्रगती केली आहे. एमटी-2 (228 मीटर) तयारीच्या टप्प्यात आहे. एमटी-3 (1,403 मीटर)चे काम 35.5% पूर्ण झाले आहे. एमटी-4 (1,260 मीटर)ने 31% प्रगती केली आहे, तर सर्वात मोठा एमटी-5 (1,480 मीटर) 55% पूर्ण झाला. 2 जानेवारी 2026 रोजी त्या बोगद्याचे खोदकाम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आणि दोन्ही बाजू जोडल्या गेल्या. एमटी-6 (454 मीटर)ने 35% प्रगती केली आहे आणि एमटी-7 (417 मीटर)ने 28% प्रगती केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Continue reading

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....

17 मार्चला मुंबईत टपाल पेन्शन अदालत

मुंबईच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांनी टपाल विभागातल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटूंब वेतनधारकांसाठी येत्या 17 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता टपाल पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांच्या कार्यालयात ही पेन्शन अदालत घेतली जाईल. महाराष्ट्र आणि...

तत्काळ पासपोर्टसाठी पुण्यात 7 तारखेला विशेष मोहीम

पुण्यातल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने तत्काळ श्रेणीतल्या अर्जदारांसाठी पुण्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात येत्या शनिवारी, 7 फेब्रुवारीला विशेष पासपोर्ट मोहिमेचे आयोजन केले आहे. पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट लवकर मिळवून देण्यासाठी आणि तातडीच्या प्रवासाची गरज असलेल्या नागरिकांना पासपोर्ट सेवा पुरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने हा...
Skip to content