पालघरमधल्या बोईसर येथील एका रासायनिक कारखान्याचे संचालक, उदयोन्मुख उद्योजक वैभव विजय केळुसकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. ते ४३ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील उद्योजक विजय केळुसकर यांचे ते पुत्र होत. काही वर्षांपूर्वी त्यांनी या कारखान्याची सूत्रे आपले वैभव व विनय या दोन्ही मुलांच्या हाती सोपविली. या कारखान्याची भरभराट घडवून आणण्यासाठी दोन्ही मुलांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. वैभव केळुसकर बोरीवली-बोईसर ये-जा करून कारखाना सांभाळत होते. अचानक वैभव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
काही वर्षांपूर्वी विजय केळुसकर यांच्या विनय या वैभवपेक्षा लहान मुलाचेही अचानक देहावसान झाले. हाताशी आलेली दोन्ही मुले ईश्वराने हिरावून नेल्यामुळे बोईसर, पालघर आणि बोरीवली पूर्व येथील नागरिकांमध्ये दुःख व्यक्त होत आहे. केळुसकर यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कशेणे आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून केळुसकर परिवार जय महाराष्ट्र नगर येथे वास्तव्यास आहे.

