ठाणे पोलीस दल गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांविरुद्ध मोहिमा राबवून कित्येक कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करत असले तरी अंमली पदार्थांच्या व्यापाराचा ‘आका’ त्यांना अद्यापी मिळालेला नाही. ठाणे रेल्वेस्थानक परिसरात (पूर्व + पश्चिम) हे गर्दुल्ले ठाण मांडून बसलेले दिसत आहेत. अंमली पदार्थांची मोठी विक्री अशा गर्दुल्ल्यांकडूनच होत असते, असे गुन्हेगारी वर्तुळात बोलले जाते. असाच एक गर्दुल्ल्यांचा अड्डा कोर्टनाक्याकडून येणाऱ्या बसेस सॅटिस पुलावर (पश्चिम) चढताना जो कोपरा आहे, तेथे निर्धास्त बसलेला असतो. समोरच्या सुलभ शौचालय परिसरातही त्यांचा वावर असतो. कचरावेचक म्हणून ते काम करत असतात. त्यांच्याकडे पावडरीच्या पुड्या तयार असतात. ओळखीच्या गिऱ्हाईकांना या पुड्या ते विकतात.
त्यांच्याकडून पुड्या घेणारेही यथायथाच दिसत असतात. भिकारी, मळकट कपडे घातलेले अशी ही मंडळी रात्री नऊ वाजल्यानंतर पॉश बारच्या बाहेर, तसेच वागळे इस्टेट परिसरातील गिनेचुने पब, ज्युपिटरच्या गल्लीतील तारांकित हॉटेलनजीक, उपवन परिसरातील निवडक लॉजेस, चितळसर परिसरातील मेडोजच्या आसपासचे बार, त्याच्यापुढे पाटलीपाडा परिसरातील

हिरानंदानी संकुलातील पॉश हॉटेल्स, याच्या मागच्या बाजूस काहीशा निवांत परिसराशेजारी असलेले तारांकित हॉटेल, त्याच्याही पुढे कासारवडवली, गायमुख येथे रात्री उशिरापर्यंत उघडे राहणारे बार आदी अनेक ठिकाणी चढ्या भावात गर्द वा एमडी गोळ्यांच्या पावडरी केलेल्या पुड्या सहज उपलब्ध असतात. फरक इतकाच असतो की पक्की ओळख असल्याशिवाय ही मंडळी पुडीचा ‘कागद’ही दाखवत नाहीत.
रात्री अकरा वाजल्यानंतर आलिशान गाड्या वा पॉश स्पोर्ट बाईक्स वागळे इस्टेटपासून अगदी चेन्ना गावापर्यंत खुशाल दौडत असतात. चेन्ना गावात तर अनेक छोटेखानी बंगले वा कॉटेजेस उभारण्यात आले आहेत. येथे तर शुक्रवारी संध्याकाळपासून ‘जलवे’च असतात, असे तेथील आदिवासींनी सांगितले. शुक्रवारी रात्रीपासून ‘आज आँखोसे नशा करले..’ ‘मै तो टल्ली हो गयी..’ सपना चौधरीची जवळजवळ सर्वच पण ‘तेरी आँखोका यह काजल..’ या व अशा अनेक आयटम साँग्सवर युवा पिढी अक्षरशः दंगा करत असते. एकदोन ठिकाणी तर बृहन्नडा नाचताना दिसतात. भिवंडीच्या वाटेवरील कापूरबावडी, बाळकूम, त्यापुढे पुराणिक व्हिलाच्या समोरील बाजूस, खुद्द भिवंडीत अगदी मोजक्याच ठिकाणी हा संगीत दंगा चालत असतो. अशा या ठाणे शहरातील दररोजच्या हॉटेल आणि मनोरंजन क्षेत्राची उलाढाल सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांपर्यंत सहज जात असेल असे एकाने सांगितले. काही तर म्हणाले यापेक्षाही अधिक असू शकते. आणि आता तर दिवाळी व नंतर येणाऱ्या जिल्हा परिषद, नगर परिषद, पालिका, महापालिका यांच्या होऊ घातलेल्या निवडणुका म्हणजे दिवसभर राबराब राबणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारांकडून ‘श्रमपरिहार’ म्हणून हा ‘नजाराणा’ दिला जाईलच, यात शंका नाही. या निवडणुकीच्या धामधुमीत पनवेल बाजूच्या सर्व बार आणि कॉटेजेसमध्ये मात्र ‘सुनो बारबालाओं.. आया है कन्हेया..’ हे ऐकायला मिळू नये, ही भाबडी अपेक्षा!